गणरायाच्या चरणी पोलिसांचे साकडे; उत्सवात शांतता-सलोखा राखण्याचा संकल्प
अमळनेर : विक्की जाधव.
संत सखाराम महाराज आणि पूज्य साने गुरुजी यांच्या पावन पदस्पर्शाने समृद्ध अमळनेर नगरीची सामाजिक सलोखा आणि शांततेची परंपरा यंदाही अबाधित राहावी, तसेच आगामी गणेशोत्सव निर्विघ्न आणि उत्साहात पार पडावा, यासाठी अमळनेर पोलिस प्रशासनाने श्री गणरायाच्या चरणी साकडे घातले. येत्या १४ सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला सुरुवात होत असून शहरासह तालुक्यात गणेश मंडळांकडून जय्यत तयारी सुरू झाली आहे.
स्टेशन रोडवरील गणेशमूर्ती केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी उपविभागीय पोलिस अधिकारी विनायक कोते, पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्यासह पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत श्री गणरायाची आरती करण्यात आली. यावेळी गणेशोत्सव काळात शहरातील शांतता, सामाजिक सलोखा आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी, कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी गणरायाकडे प्रार्थना करण्यात आली.
गणेशोत्सवातील मिरवणुका, विसर्जन सोहळे आणि गर्दीची ठिकाणे लक्षात घेता पोलिस प्रशासनाकडून विशेष नियोजन करण्यात येत आहे. मिरवणुकीचे मार्ग, संवेदनशील भाग आणि वाहतूक व्यवस्थेवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे. गणेश मंडळांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, ध्वनिप्रदूषणासह सर्व नियमांचे पालन करून मिरवणुका शांततेत पार पाडाव्यात आणि पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषासोबतच शांतता, शिस्त आणि सामाजिक सलोख्याचा संदेश देत अमळनेरचा गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्याचे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.