
बिबट्याच्या वाढत्या वावराने अमळनेर तालुक्यात शेतकरी धास्तावले
नंदगाव, रंजाणे, आंबारे, खापरखेडा परिसरात तातडीने उपाययोजनांची मागणी
अमळनेर : विक्की जाधव.
गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येलाच अमळनेर तालुक्यातील नंदगाव, रंजाणे, आंबारे व खापरखेडा परिसरातील शिवारात बिबट्याचा वाढता वावर शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय ठरला आहे. उमेश पारधी यांच्या गाय व वासरावर बिबट्याने हल्ला केल्याच्या घटनेनंतर परिसरातील शेतकरी व शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकऱ्यांना दिवसभर शेतात काम करावे लागत असल्याने बिबट्याच्या वावरामुळे त्यांच्या जीविताला धोका निर्माण होण्याची शक्यता असून पिकांचेही नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे.
या पार्श्वभूमीवर संबंधित विभागांनी तातडीने दखल घेऊन नंदगाव, आंबारे रंजाणे, आंबारे व खापरखेडा शिवाराची पाहणी करून पंचनामा करावा, तसेच बिबट्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना बिबट्यापासून बचावासाठी आवश्यक मार्गदर्शन व सुरक्षा उपाय उपलब्ध करून देण्याबरोबरच पिकांचे नुकसान झाल्यास सर्वेक्षण करून योग्य नुकसानभरपाई द्यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.
परिसरात वन विभाग व संबंधित यंत्रणेची गस्त आणि देखरेख वाढवावी, तसेच शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाने तातडीने ठोस कार्यवाही करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. त्यामुळे आता वन विभाग बिबट्याच्या वाढत्या वावराची कितपत गांभीर्याने दखल घेतो आणि शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी कोणती पावले उचलतो, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.