बारामती लोकसभेतील भूषण सुर्वे यांची शिवसेना सोशल मीडिया पश्चिम महाराष्ट्र विभागीय उपसमन्वयकपदी निवड
बारामती, प्रतिनिधी – वर्षा चव्हाण
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार तसेच शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेत निष्ठेने कार्य करणारे शिवश्री भूषण सुर्वे यांची शिवसेना सोशल मीडिया पश्चिम महाराष्ट्र विभागीय उपसमन्वयकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्य अधिकारी मंगेश चिवटे तसेच शिवसेना सोशल मीडिया प्रमुख प्रतीक शर्मा यांच्या शिफारशीनंतर पश्चिम महाराष्ट्र प्रमुख महादेव सलवदे यांनी ही नियुक्ती जाहीर केली.
गेल्या वर्षभरात बारामती लोकसभा मतदारसंघ प्रमुख म्हणून भूषण सुर्वे यांनी पक्षसंघटनेचे काम प्रभावीपणे सांभाळले आहे. शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि सोशल मीडिया या दोन्ही विभागांची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडत त्यांनी अनेक गरजू रुग्णांना मदत मिळवून देण्याबरोबरच शिवसेनेचे विचार तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे.
याचबरोबर पुणे जिल्ह्यातील संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी इंदापूरचे अवधूत पाटील यांची पुणे जिल्हा प्रमुख, बारामतीचे सुशीलकुमार आडगळे यांची पुणे उपजिल्हा प्रमुख तसेच इंदापूरचे सागर आवटे यांची इंदापूर शहर प्रमुखपदी निवड जाहीर करण्यात आली.
माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात शिवसेनेचे विचार आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या “८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण” या संकल्पनेला अनुसरून भूषण सुर्वे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघात पक्षाचे कार्य घराघरापर्यंत पोहोचविण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी अनेकदा कौतुक केल्याचे महादेव सलवदे यांनी सांगितले.
सोशल मीडियाच्या माध्यमातून शासकीय योजनांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवून त्याचा लाभ गरजू नागरिकांना मिळवून देण्यासाठी सुर्वे यांनी केलेले कार्य उल्लेखनीय मानले जाते. त्यामुळे शिवसेनेत सोशल मीडियाचा प्रभावी आणि वेगळा चेहरा म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
बारामतीसारख्या राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या मतदारसंघात संघटन वाढविण्यासाठी त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेत पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आल्याचे बोलले जात आहे. या नियुक्तीमुळे पक्षातील सर्वसामान्य आणि मेहनती कार्यकर्त्यांनाही योग्य संधी व न्याय मिळत असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाल्याची भावना शिवसैनिकांमध्ये व्यक्त होत आहे.
