म.वा. मंडळात शिवजयंती उत्साहात; विचारांची उजळणी, कार्याची प्रेरणा..
अमळनेर : विक्की जाधव.
स्वराज्याचे शिल्पकार आणि दूरदृष्टीचे धनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६ व्या जयंतीनिमित्त येथील मराठी वाङ्मय मंडळात उत्साहपूर्ण वातावरणात अभिवादन कार्यक्रम पार पडला. महाराजांनी दिलेले स्वराज्याचे तत्वज्ञान, शाश्वत विकासाची दृष्टी आणि लोककल्याणकारी प्रशासनाची शिकवण आजही तितकीच प्रेरणादायी आहे, याची उपस्थितांनी यावेळी उजळणी केली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी म.वा. मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. रविंद्र कुलकर्णी, जेष्ठ मार्गदर्शक अजयभाऊ केले, डॉ. महेश पाटील व डॉ. विजय तुंटे यांच्या हस्ते महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले. “शिवविचार केवळ इतिहास नसून तो वर्तमान आणि भविष्य घडवणारी ऊर्जा आहे,” असा संदेश यावेळी मान्यवरांनी दिला.
याप्रसंगी आर. डी. पाटील, चंद्रकांत शिंदे, गोविंद पाटील, हनुमंत पाटील, शांताराम पाटील, हेमंत बाळापुरे, जगदिश कुलकर्णी आदी उपस्थित होते. कार्यक्रमात शिवचरित्राचा गौरव करत सामाजिक बांधिलकी जपण्याचा संकल्प करण्यात आला. म.वा. मंडळातील शिवजयंती सोहळा हा विचारांची प्रचिती देणारा आणि नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरला.