करमाळा प्रतिनिधी (सागर गायकवाड):- करमाळा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात वाढती वाहतूक आणि होणारे अपघात रोखण्यासाठी या भागात पाचही बाजूंनी गतीरोधक बसवावेत, तसेच रस्त्यावरील खड्डे बुजवावेत, अशी मागणी नगरसेविका निर्मला बाबुराव गायकवाड यांनी मुख्याधिकार्यांकडे एका पत्राद्वारे केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज पुतळा हा शहरातील मुख्य केंद्रबिंदू असून, येथून अहिल्यानगरकडे जाणारा रस्ता आणि श्री कमला भवानी मंदिर परिसरात जाणार्या रस्त्यांवर वाहनांची प्रचंड वर्दळ असते. या भागात ‘कन्या प्रशाला’ आणि ‘आण्णासाहेब हायस्कूल’ यांसारख्या शैक्षणिक संस्था असल्याने शालेय विद्यार्थी, लहान मुले आणि नागरिक यांची मोठी ये-जा असते. गतीरोधक नसल्याने या भागात वारंवार लहान-मोठे अपघात होत असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
नगरसेविका गायकवाड यांनी पत्रात खालील पाच महत्त्वाच्या ठिकाणांचा उल्लेख केला आहे:
१. जुना बायपास रोड: डॉ. लावंड हॉस्पिटल समोर.
२. श्री देवीचा रोड: मारुती मंदिर समोर.
३. भवानी पेठ रस्ता: राखूंडे हॉटेल जवळ.
४. एसटी बस स्थानक रस्ता: माळवे घरासमोर.
५. दत्त पेठ रस्ता: माने यांच्या घरासमोर.
यासोबतच पुतळ्यासमोर असलेले खड्डे त्वरित बुजवून रस्ता दुरुस्त करावा, अशीही विनंती त्यांनी केली आहे.

नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि संभाव्य मोठे अपघात टाळण्यासाठी करमाळा नगर परिषदेने यावर तातडीने कार्यवाही करावी, अशी आग्रही मागणी निर्मला गायकवाड यांनी केली आहे. या मागणीमुळे आता प्रशासन गतीरोधक बसवण्याचे काम कधी हाती घेते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
