महिलांचा सर्वसमावेशक विकास महत्त्वाचाप्रा. इशिता घोष यांचे प्रतिपादन..
अमळनेर : विक्की जाधव.
रुक्मिणी ताई वाणिज्य आणि कला महाविद्यालयात ‘महिला सबलीकरण’ या विषयावर चर्चासत्र उत्साहात संपन्न झाले. यावेळी प्रमुख वक्त्या प्रा. इशिता घोष (पदार्थशास्त्र विभाग, प्रताप महाविद्यालय, अमळनेर) यांनी महिलांच्या सर्वसमावेशक विकासावर सखोल मांडणी केली. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही महिला सबलीकरण अपेक्षेइतके प्रभावी झालेले नाही, असे नमूद करत त्यांनी आजच्या काळात या विषयाची गरज अधिक तीव्र झाल्याचे सांगितले.

भारतामध्ये सेवाक्षेत्र व असंघटित क्षेत्रात महिलांना दिले जाणारे मानधन, वेतन व मोबदला तुलनेने अल्प असल्याने असमानता स्पष्टपणे दिसून येते, असे त्यांनी अधोरेखित केले. विविध क्षेत्रांत महिलाच आधारस्तंभ असतानाही त्यांच्या परिश्रमांना योग्य मान्यता मिळत नाही. अनेक ठिकाणी संघर्ष, अडथळे व अन्यायाला सामोरे जावे लागते; त्यामुळे महिलांच्या सक्षमीकरणासाठी ठोस धोरणात्मक पावले उचलण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
महिलांचा साक्षरता दर वाढवणे, राज्य व केंद्रस्तरावर शिष्यवृत्ती वाढीसाठी सकारात्मक निर्णय घेणे आणि महिलांचा सन्मान व प्रतिष्ठा जपणे ही समाजाची नैतिक जबाबदारी असल्याचे प्रा. घोष यांनी स्पष्ट केले. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य शेख होते. कार्यक्रमास विद्यार्थिनींची लक्षणीय उपस्थिती होती.