पळासदळे ग्रामसभेत भ्रष्टाचाराचा भांडाफोड; ग्रामसेवक मॅडम भरसभेतून पसार! पळसदळे ग्रामपंचायत सील
अमळनेर : विक्की जाधव.
अमळनेर तालुक्यातील ग्रामपंचायत पळासदळे येथे झालेल्या वार्षिक सर्वसाधारण ग्रामसभेत ग्रामस्थांनी वार्षिक लेखाजोख्याबाबत प्रश्न उपस्थित करताच मोठा गोंधळ निर्माण झाला. ग्रामसेवक आशा पाटील यांना खर्च, कामे व नोंदींबाबत प्रश्न विचारले असता त्यांनी कोणतेही समाधानकारक उत्तर न देता भर सभेतुन पळकाढला.

सभेदरम्यान सर्व दप्तर ग्रामसभेसमोर ठेवण्यात आल्यानंतर त्यामधून अनेक संशयास्पद नोंदी व अनियमितता उघडकीस आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. यानंतर ग्रामसेवकांना थेट प्रश्न विचारले असता त्यांनी कुठलेही स्पष्टीकरण न देता अचानक भरसभेतून आपल्या दुचाकीवरून सभा सोडून निघून जाण्याचा प्रयत्न केला. ग्रामस्थांनी त्यांना थांबवून प्रश्नांची उत्तरे देण्याची मागणी केली, मात्र ग्रामसेवक दप्तर तिथेच टाकून निघून गेल्याचा घटना काल घडली.
या प्रकारानंतर ग्रामस्थांनी तात्काळ बीडीओ साहेब, जिल्हाधिकारी तसेच माननीय खासदार स्मिता वाघ यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. सर्व अधिकारी त्या वेळी कार्यक्रमात व्यस्त असल्याने कोणताही प्रतिसाद मिळू शकला नाही. दरम्यान, घटनास्थळी उपस्थित असलेले पोलीस पाटील श्री. संजय बाबुराव पाटील यांनी पोलीस प्रशासनाशी संपर्क साधत परिस्थितीची माहिती दिली. बीडीओ साहेबांच्या सूचनेनुसार सरपंचांच्या हस्ते सर्व दप्तर ग्रामपंचायतीत ठेवण्यात आले. काही ग्रामस्थ व पोलीस पाटील यांच्या साक्षीने ग्रामपंचायत कार्यालय सील करण्यात आले असून चावी सरपंच व शिपाई यांच्याकडे देण्यात आली आहे.
बीडीओ साहेबांनी दिलेल्या तारखेला त्यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत उघडून पुन्हा सभा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उमेश पाटील, भिकन बोरसे, हर्षल पाटील, राजेंद्र पाटील, दीपक पाटील, नाना अभिमान पाटील, मनोज पाटील, संभाजी पाटील, अनिल पाटील, ईश्वर पाटील यांच्यासह सर्व ग्रामस्थांनी ग्रामसेवकावर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
प्रतिक्रिया :
यासंदर्भात मार्मिकने बीडीओ एन आर पाटील यांच्याशी संपर्क केला असता पाच वर्षाचा हिशोब हा कार्यकाळा पंधरा दिवस बाकी असताना विचारला गेला असे निदर्शनास आले आहे तर 100 लोकांच्या समोर एकट्या ग्रामसेवक कोणाकोणाला उत्तर देतील हा ही प्रश्न आहे तर सदर ठिकाणी पीडब्ल्यूडी चे काम चालू असून ते कार्यक्षेत्र ग्रामपंचायतच्या अधिकार क्षेत्रात येत नाहीत हे ही समजून घेतले पाहिजे. कारवाई संदर्भात त्यांच्याशी बोलले असता त्यांनी योग्य ती कारवाई करून योग्य उत्तर देण्यात येईल ज्याने नागरिकांचे समाधान होईल असे आश्वासित केले.