
अतिवृष्टीत नुकसानग्रस्त अमळनेर तालुका भरपाईपासून वंचित! आमदार शिरीषदादा चौधरींचे पालकमंत्र्यांना निवेदन.
अमळनेर : विक्की जाधव.
तालुक्याचा समावेश १८ ऑक्टोबर २०२५ रोजी जाहीर झालेल्या अतिवृष्टी नुकसानभरपाईच्या शासन निर्णयात नसल्याचे समोर येताच, शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. गुलाबराव पाटील यांना पाळधी येथे भेट देऊन आमदार शिरीषदादा चौधरी यांनी अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने निवेदन सादर केले.

या निवेदनात त्यांनी नमूद केले की, अमळनेर तालुक्यात अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून, शासन निर्णयानुसार जळगाव जिल्ह्यातील ३,२५,३५९ शेतकऱ्यांना २,४७,२६२ हेक्टर क्षेत्रासाठी तब्बल ₹२९९९४.४७ लाख इतकी मदत जाहीर झाली आहे. मात्र, यात अमळनेर तालुक्याचा कुठेही समावेश नसल्याने स्थानिक शेतकरी सरकारी मदतीपासून वंचित राहणार आहेत.

आमदार चौधरी यांनी पालकमंत्र्यांना विनंती करत सांगितले की, “अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळावा, यासाठी तात्काळ सुधारित शासन निर्णय निर्गमित करण्यात यावा.” यावर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, “अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय लवकरच घेतला जाईल,” असे आश्वासन दिले.

या वेळी शिवसेना तालुका प्रमुख सुरेश पाटील, किशोर पाटील, रोशन सोनवणे, माजी नगरसेवक अनिल महाजन आणि कार्यकर्ते उपस्थित होते.