चौथी व सातवी शिष्यवृत्ती परीक्षेला शासनाची मान्यता.
मार्मिक न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून पुढील शैक्षणिक वर्षापासून चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा पुन्हा घेण्यात येणार आहे. शिक्षण विभागाने या निर्णयास मान्यता दिल्याची माहिती समोर आली आहे.

या परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्ता, ज्ञान आणि स्पर्धात्मक तयारीची चाचणी घेतली जाणार असून ग्रामीण तसेच शहरी भागातील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळणार आहे. शासनाकडून लवकरच वेळापत्रक आणि अभ्यासक्रमाबाबत मार्गदर्शक सूचना जाहीर होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, शिक्षक आणि पालक वर्गातून या निर्णयाचे स्वागत करण्यात आले असून, “ही शिष्यवृत्ती परीक्षा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीस नवी दिशा देणारी ठरेल,” अशी प्रतिक्रिया अनेकांकडून व्यक्त करण्यात आली आहे.