अमळनेरात राजकीय तापमान चढले! उन्मेष पाटील यांचा वाद चिघळला, त्यात अनंत निकम यांचे ‘चहा आमंत्रण’ चर्चेत
अमळनेर : विक्की जाधव.
पालिकेच्या निवडणुकीच्या वाऱ्यांनी जोर पकडला असून, राजकीय वातावरण तापू लागले आहे. प्रत्येक पक्षाने तयारीला सुरुवात केली असताना, माजी खासदार उन्मेष पाटील यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

शेतकऱ्यांच्या दुष्काळ आणि पीकविमा संदर्भातील प्रश्नावर प्रशासनाला विचारणा करताना उन्मेष पाटील यांनी “अमळनेरचे ताई आणि दादा यांना फटके मारले पाहिजेत” असे वक्तव्य केले होते, ज्यावरून राजकारण पेटले आहे.

या विधानानंतर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त करत माजी खासदार उन्मेष पाटील यांच्या पुतळ्याचे भाजपा ने दहन केले. कार्यकर्त्यांनी अमळनेरात उन्मेष पाटील यांनी पाऊल ठेवून दाखवावे, असे खुले आव्हान दिल्याने वातावरण आणखी तापले. तालुक्यात चर्चा याच मुद्द्यावर केंद्रित असून, गावागावांत याच विषयाची चर्चा रंगत आहे.

या प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. सामाजिक कार्यकर्ते अनंत निकम यांनी या वादात उडी घेत सोशल मीडियावरून एक अप्रत्याशित पाऊल उचलले आहे. त्यांनी माजी खासदार उन्मेष पाटील यांना थेट खुले आव्हान देत म्हटले आहे, “उन्मेष पाटील साहेब, अमळनेरात पाय ठेवा आणि माझ्या घरी चहा पिण्यास या.” आपणास जाहिर निमंत्रण. या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली असून, नागरिकही दोन गटांत विभागले आहेत.

आता सगळ्यांच्या नजरा उन्मेष पाटील यांच्यावर लागल्या आहेत. ते सामाजिक कार्यकर्ते अनंत निकम यांचे आमंत्रण स्वीकारतात का, की या वादाला अधिक पेटवणारे वक्तव्य करतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेला हा संघर्ष अमळनेरच्या राजकारणात नवा रंग भरणार हे मात्र निश्चित!