शाळांची मनमानी थांबणार? पालकांना मिळणार येथे बसण्याचा हक्क
अमळनेर : विक्की जाधव.
आता पालकांना मुलांना शाळेत आणताना किंवा घेऊन जाताना बाहेर उन्हात तासन्तास उभे राहण्याची वेळ येणार नाही, अशी दिलासादायक स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. शाळांमध्ये पालकांसाठी बसण्याची योग्य व्यवस्था असावी, या मुद्द्यावर राज्यस्तरावर चर्चा रंगली असून अमळनेरमध्येही याची अंमलबजावणी होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

शहरातील अनेक शाळांमध्ये सध्या पालकांना कोणतीही सुविधा नसल्याने उन्हात, पावसात मुलांना घेण्यासाठी उभे राहावे लागते. मात्र, “पालकांचा सन्मान राखणे ही शिक्षण व्यवस्थेची जबाबदारी आहे”
अशी भूमिका घेत आमदार मनीषा कायंदे यांनी विधान परिषदेत हा मुद्दा उपस्थित केला.
त्यांच्या या भूमिकेमुळे शिक्षण विभागावर दबाव वाढला असून सर्व शाळांना आवश्यक सुविधा देण्याचे निर्देश दिले जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, अमळनेरमधील पालकांनी या निर्णयाचे स्वागत केले असून “फी भरूनही अपमान सहन करावा लागत होता, आता तरी न्याय मिळेल” अशी भावना व्यक्त केली आहे. येत्या काळात शाळांमध्ये वेटिंग रूम, सावलीची व्यवस्था आणि बसण्याची सोय अनिवार्य केल्यास पालकांना मोठा दिलासा मिळणार असून शिक्षण व्यवस्थेत सकारात्मक बदल घडण्याची चिन्हे दिसत आहेत.