बेकायदेशीर स्पीड ब्रेकरचा बळी; दोषींवर कारवाईसाठी अनंत निकम यांचे अमळनेर पो. स्टे. ला निवेदन.
अमळनेर : विक्की जाधव.
शहराजवळील दाजीबा नगर परिसरात बेकायदेशीर व असुरक्षित स्पीड ब्रेकरमुळे झालेल्या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाल्याची गंभीर घटना समोर आल्यानंतर आता या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. २८ मार्च रोजी घडलेल्या या अपघातात संबंधित महिला गंभीर जखमी झाली होती व उपचारादरम्यान ३ एप्रिल रोजी तिचा मुंबई येथे मृत्यू झाला. रस्त्यावर कोणतीही पूर्वसूचना, रंगकाम किंवा रिफ्लेक्टर नसलेल्या गतीरोधकामुळे हा अपघात घडल्याचा आरोप असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते अनंत रमेश निकम यांनी या प्रकरणात संबंधित दोषींवर तात्काळ कारवाई व्हावी, या मागणीसाठी अमळनेर पोलीस स्टेशन येथे निवेदन दिले आहे. त्यांनी आपल्या निवेदनात सार्वजनिक सुरक्षेचा गंभीर प्रश्न उपस्थित करत, नियमबाह्य स्पीड ब्रेकर उभारणाऱ्या संबंधित वेक्ती आणि विभागावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अशा प्रकरणात FIR नोंदवणे बंधनकारक असल्याचे नमूद करत, निष्काळजी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली आहे.