ओला दुष्काळ जाहीर करा! अमळनेरात शेतकऱ्यांचा आक्रोश माजी खासदार उन्मेष पाटील आक्रमक; अधिकाऱ्यांवर संतापाचा उद्रेक!
अमळनेर : विक्की जाधव.
अमळनेर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, हेक्टरी ५० हजार रुपये अनुदान जाहीर करावे, शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा करावा, तसेच २०२१ च्या अतिवृष्टीचे थकित अनुदान तातडीने द्यावे या मागण्यांसाठी आज हजारो शेतकऱ्यांनी उपविभागीय कार्यालयावर धडक देत महाविकास आघाडीतर्फे प्रचंड आक्रोश मोर्चा काढला. या मोर्चाचे नेतृत्व माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील, माजी खासदार उन्मेष पाटील, प्रा. सुभाष पाटील, पराग पष्टे, सुरेश पाटील, प्रमोद पाटील यांनी केले.

मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहापासून निघून तहसील कार्यालयाबाहेर आल्यानंतर सभा झाली. यावेळी डॉ. बी. एस. पाटील यांनी लोकप्रतिनिधींवर टीका करताना म्हटलं की, “आज शेतकरी आत्महत्या करत आहे आणि आमदार-खासदार व्यापारी झाले आहेत. शासनाने शेतकऱ्यांचा स्वाभिमान हरवला आहे.” माजी खासदार उन्मेष पाटील यांनी सभेतून सरकारवर तीव्र हल्ला चढवला आणि “सरकार स्वदेशी मेळावे घेतं, पण विदेशी कापूस आयात करतं!” असा प्रश्न उपस्थित केला. प्रा. सुभाष पाटील म्हणाले, “दर तीन तासाला एक शेतकरी आत्महत्या करत आहे; हे सरकारचं अपयश आहे.”

सभेनंतर मोर्चेकरी उपविभागीय अधिकारी नितीनकुमार मुंडावरे यांना निवेदन द्यायला गेले असता, वातावरण चांगलंच तापलं. तालुक्याला परिशिष्ट ‘अ’ प्रमाणे मदत मिळेल का असा प्रश्न उपस्थित होताच, अधिकाऱ्यांकडून “फक्त परिशिष्ट ‘ब’ प्रमाणे मदत मिळेल” असं उत्तर मिळताच उन्मेष पाटील संतापले. त्यांनी अधिकारी तसेच मुख्यमंत्री, आमदार आणि खासदारांविषयी संतप्त शब्द वापरत रोष व्यक्त केला. उपस्थित शेतकऱ्यांनीही पंचनामे न झाल्याबद्दल अधिकाऱ्यांना जाब विचारला.

यावेळी अधिकाऱ्यांनी ६५ मिमी पावसाची अट सांगताच उन्मेष पाटील म्हणाले, “शासनानेच ती अट काढून टाकली आहे, मग पंचनामे का होत नाहीत?” अखेर उपविभागीय अधिकारी मुंडावरे यांनी तातडीने कृषी अधिकाऱ्यांना पंचनामे सुरू करण्याचे निर्देश दिले. या मोर्चात योजना पाटील, डी. एम. पाटील, मुन्ना शर्मा, अॅड. रज्जाक शेख, प्रा. अशोक पवार, प्रशांत निकम, गजेंद्र साळुंखे यांसह अनेक शेतकरी व पदाधिकारी उपस्थित होते. वातावरणात तीव्र रोष आणि शेतकऱ्यांचा जिवंत आक्रोश यामुळे संपूर्ण तहसील परिसर दणाणून गेला.