न्यायासाठी शिरसाठ कुटुंबाचा संघर्ष : २ ऑक्टोबरपासून उपोषण”
अमळनेर : विक्की जाधव.
पीळोदे गावाच्या इतिहासात प्रथमच, ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येत आहे. अनुकंपा तत्त्वावर नियुक्तीसाठी तब्बल तीन ते चार वर्षांपासून पाठपुरावा करूनही न्याय न मिळाल्याने निलेश प्रकाश शिरसाठ आणि त्यांचे कुटुंब महात्मा गांधी जयंती दिनी, २ ऑक्टोबर २०२५ रोजी उपोषण सुरू करणार आहे. “आमच्या मागण्या न्याय्य असूनही ग्रामपंचायतीकडून सतत दुजाभाव होत आहे,” असा गंभीर आरोप अर्जदाराने केला आहे.

शिरसाठ कुटुंबाच्या म्हणण्यानुसार, घरातील कर्ता पुरुष कर्तव्यावर असताना निधन झाले होते. त्यांच्या जागी अनुकंपा तत्त्वावर शिपाई पद मिळावे यासाठी सातत्याने अर्ज करण्यात आले, मात्र ग्रामपंचायतने त्याकडे दुर्लक्ष केले. उलट रिक्त पदावर दुसऱ्याला काम दिले आणि तसा ठराव मंजूर केला, असा आरोपही त्यांनी केला. “मी काम नाकारले असते तर पुन्हा पुन्हा अर्ज का केला असता?” असा सवाल उपस्थित करत शिरसाठ यांनी ग्रामपंचायतीच्या निर्णय प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे.मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद जळगाव तसेच गटविकास अधिकारी पंचायत समिती अमळनेर यांच्याकडून नोटीस आल्यावरही ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केल्याचे कुटुंबाचे म्हणणे आहे. त्यातच, गेल्या काही महिन्यांपासून एक अनोळखी व्यक्ती शिपाई म्हणून काम करत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. या अन्यायाविरुद्ध आवाज बुलंद करत, “आम्हाला हक्क न मिळाल्यास लोकशाही मार्गाने संघर्ष करावा लागेल,” असे सांगत शिरसाठ कुटुंबाने उपोषणाची तयारी जाहीर केली आहे.