बच्चुभाऊ कडू यांच्या नेतृत्वात जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य जन आक्रोश मोर्चा प्रशासनाची चांगलीच उडाली धावपळ
मार्मिक न्यूज नेटवर्क : विक्की जाधव जळगाव
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकडे शासनाने वारंवार केलेल्या दुर्लक्षाचा निषेध करण्यासाठी आज दिनांक १७ सप्टेंबर २०२५ रोजी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या मोर्चाचे नेतृत्व शेतकरी संघटनेचे नेते बच्चुभाऊ कडू यांनी केले तर माजी खासदार उमेश दादा पाटील यांनीही शेतकरी बांधवांना संबोधित केले.
मोर्चासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मात्र, पोलिसांनी प्रवेशद्वार उघडण्यास नकार दिल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप उसळला. अखेर शेतकऱ्यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत प्रवेश करून आपली ताकद दाखवून दिली.
मोर्चात शेतकरी बांधवांची झालेली एकजूट पाहून प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढण्याच्या निर्धाराने संपूर्ण परिसर घोषणाबाजीने दुमदुमून गेला. या जनआक्रोशामुळे शासनाला शेतकऱ्यांच्या मागण्यांची गांभीर्याने दखल घ्यावी लागणार, अशी चर्चा यानंतर रंगू लागली आहे.