“संतभूमी अमळनेरात सौहार्द टिकविण्याचा निर्धार – पोलिस अधीक्षक रेड्डींचे मार्गदर्शन” बोलवली तातडीची शांतता कमिटीची बैठक
अमळनेर : विक्की जाधव.
गणेश उत्सवात कारवाई झालेल्या मंडळ आणि शिवशक्ती चौकात झालेल्या महिलांवरील अश्लील इशारे व दगडफेकीच्या प्रकरणानंतर पोलिसांनी कारवाईची चक्रे वेगाने फिरवली आहेत. या गुन्ह्यातील काही आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर न्यायालयाने त्यांना सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

घटनेनंतर निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीत जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी हे अमळनेर शहरात ठाण मांडून होते. त्यांनी तातडीने दोन्ही समाजातील नागरिकांची शांतता मीटिंग बोलावून परस्पर संवादातून तणाव शमविण्याचे काम केले. या बैठकीत गणेश मंडळांचे पदाधिकारी, जाणकार नागरिक तसेच इंदिरा भवन येथे झालेल्या शांतता कमिटीच्या बैठकीत मुस्लिम समाजातील प्रमुख सदस्य उपस्थित होते. गणेश मंडळांकडून आश्वासन घेण्यात आले की यां पुढे गणेशोत्सव शांततेत, सुव्यवस्थेत पार पडेल. त्याचप्रमाणे मुस्लिम समाजाच्या शांतता समितीची स्वतंत्र बैठक घेऊन त्यांनाही मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी मार्गदर्शन करताना एस. पी. रेड्डी म्हणाले,
“उत्तर महाराष्ट्रातून एकेकाळी असंख्य अधिकारी निर्माण झाले. अमळनेर हे शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखले जात होते. मात्र अलीकडच्या काळात समाजात दुभंगाचे चित्र दिसत आहे, जे या संतभूमीला शोभणारे नाही. दोषींवर कठोर कारवाई केली जाईलच, पण समाजात सौहार्द टिकविणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.”
यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, प्रांताधिकारी नितीनकुमार मुंडावरे, डीवायएसपी विनायकराव कोते, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.