“40 वॅटच्या लाईटालाही मोहताज झाले छत्रपती शिवाजी नाट्यगृह; पालिका झोपली आणि पुतळा अंधारात हरवला”
अमळनेर : विक्की जाधव.
कुठे गेले ते शिवाय यांच्या नावावर राजकारण करणारे ? “महाराज आम्हाला माफ करा” अशी हाक आता अमळनेरच्या जनतेतून ऐकू येत आहे. कारण ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी संपूर्ण हिंदुस्थान अंधारातून उजेडात आणला, त्यांच्याच पूर्णाकृती पुतळ्याला अमळनेर नगर परिषदेच्या निष्काळजीपणामुळे अंधारात उभे राहावे लागत आहे. साधा 40 वॅटचा दिवा लावण्याचीही जबाबदारी न पार पाडणाऱ्या पालिकेवर नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.
नुकतेच छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर करारावर दिलेले टेंडर संपुष्टात आल्याने ठिकाणी सील बसवण्यात आली आहे, परिणामी या नाट्यगृहाच्या प्रांगणात असलेला पुतळा अंधारात गेला आहे. शहरातील कोणत्याही जागरूक नागरिकांनी या प्रश्नावर आवाज उठवला नाही हे अधिकच खेदजनक आहे.
माजी आमदार शिरीष चौधरी यांनी शहराच्या सौंदर्यात भर टाकण्यासाठी आणला होता पुतळा.
माजी आमदार शिरीष चौधरी यांनी काही वर्षांपूर्वी अमळनेर शहराच्या सौंदर्यवर्धनाचा महत्त्वाचा टप्पा गाठला होता. त्यांनी शहरात छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यांची उभारणी करून शहराला नवा देखावा दिला होता. परंतु आता या ऐतिहासिक ठिकाणांची जबाबदारी नगरपालिकेकडे असून, स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, तसेच लाईट व्यवस्थापनाची जबाबदारी ते टाळताना दिसत आहेत. परिणामी, इतिहासाचा अभिमान असलेला हा भाग अंधार, कचरा आणि दुर्लक्षामुळे विद्रुप होत आहे.
नुकताच करार संपल्याने संदीप घोरपडे यांच्याकडून नाट्यगृहाची जबाबदारी परत घेण्यात आली आहे. कराराचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर यां ठिकाणी सील लावण्यात आले असून, आता नाट्यगृहाची देखभाल आणि व्यवस्थापन यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
नागरिकांचे मत असे आहे की नगरपालिकेने डोळे उघडून पुढील टेंडर देताना केवळ उत्पन्न मिळवण्यावर भर न देता योग्य ठेकेदार निवडणे महत्त्वाचे आहे.
यापुढे दिल्या जाणाऱ्या टेंडरमध्ये संबंधित ठेकेदाराचा अनुभव तपासणे आवश्यक आहे. त्याने किती ठिकाणी नाट्यगृहाचे व्यवस्थापन केले आहे, त्याचा मेंटेनन्सचा अनुभव कितपत आहे, याची खात्री नगरपालिकेने करून घ्यायला हवी. केवळ करार करून नंतर ठिकाणी अंधार, कचरा आणि बेजबाबदारपणा राहिला तर त्याचा फटका नागरिकांनाच बसणार आहे. ठेकेदाराकडे सेफ्टी ट्रेनिंग आहे का, वेळोवेळी तपासणी होईल का, या मुद्द्यांवरही स्पष्टता येणे आवश्यक आहे. शहरातील सुशोभीकरणाच्या कामांना सुरुवात करून देखील त्याची योग्य देखरेख न झाल्यास त्याचे महत्त्व हरवते. शिवरायांच्या पुतळ्याला उजेड मिळणे ही शहरवासियांची प्राथमिक जबाबदारी आहे. पालिकेने तात्काळ कार्यवाही करून नाट्यगृह परिसर उजळून टाकावा, तसेच नवीन टेंडर प्रक्रियेत पारदर्शकता आणावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. अन्यथा, ज्या महाराजांनी समाजाला प्रकाश दिला, त्यांचाच पुतळा अंधारात ठेवणे ही अमळनेरकरांसाठीच लाजिरवाणी बाब ठरणार आहे.
मलिदा खाणाऱ्यांच्या मनात विचित्र हालचाली सुरू झाल्या आहेत.
नाट्यगृहाला सील बसताच काहींच्या मनात विचित्र हालचाली सुरू झाल्या आहेत. कोणताही अनुभव नसतानाही “हे टेंडर आम्हालाच मिळणार” असा भ्रम काहींनी उभा केला आहे. यावरूनच पालिका प्रशासनाने डोळे उघडावे, संबंधितांची सर्व कागदपत्रे काटेकोर तपासावी आणि वेळोवेळी नाट्यगृहाची तपासणी करून नोंदी सार्वजनिक कराव्यात, अशी मागणी होत आहे. पवित्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या पार्श्वभूमीवर मटण-दारूच्या पाट्या दिसल्या तर तो अमळनेरकरांसाठी कलंकच ठरेल. त्यामुळेच पुढील टेंडर प्रक्रियेत पालिकेने अधिक काळजी घ्यावी, असा इशारा नागरिकांतून दिला जात आहे.