भिगवनमध्ये रोज तासंतास वीजकपात आणि खाली लोबकळणाऱ्या तारा; राष्ट्रवादी काँग्रेसचा महावितरणला 7 दिवसांचा अल्टिमेटम
(निलेश गायकवाड)
भिगवण-भिगवन शहरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अघोषित वीजकपातीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. त्यातच शहरातील अनेक ठिकाणी विजेच्या तारा खाली लोबकळत असल्याने जीवितहानीची भीती निर्माण झाली आहे. या गंभीर समस्यांबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भिगवनच्या वतीने महावितरणच्या बारामती परिमंडळाला लेखी तक्रार देण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पत्रात म्हटले आहे की, भिगवन हे जिल्ह्यातील मोठे व्यापारी केंद्र आहे. मात्र वारंवार होणाऱ्या वीजकपातीमुळे सर्वसामान्य नागरिकांसह व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. सर्वात धोकादायक बाब म्हणजे पावसाळ्यात अनेक ठिकाणी विजेच्या तारा रस्त्यालगत खाली आल्या आहेत. त्यामुळे चालणाऱ्या नागरिकांना आणि वाहनचालकांना त्याचा स्पर्श होऊन मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. जर जिवंत तार पाण्यात पडली तर जीवितहानी होऊ शकते, असा इशाराही पत्रात देण्यात आला आहे.
तीन प्रमुख मागण्या
राष्ट्रवादी काँग्रेसने महावितरण प्रशासनाकडे 3 मुख्य मागण्या केल्या आहेत.
1. शहरातील अघोषित वीज कपात त्वरित थांबवावी.
2. खाली आलेल्या विजेच्या तारा सुरक्षित उंचीवर नेण्यात याव्यात.
3. पावसाळ्यापूर्वी धोकादायक पोल आणि ट्रान्सफॉर्मरची दुरुस्ती पूर्ण करावी.
महावितरण प्रशासनाने या तक्रारीची गंभीर दखल घेऊन 7 दिवसांच्या आत कार्यवाही करावी, अन्यथा गावकऱ्यांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस भिगवनने दिला आहे. या पत्राची नोंद 28 जुलै 2025 रोजी महावितरणच्या आवक लिपीक कार्यालयात झाली आहे.