अमळनेरात विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी NSUIचा एल्गार; भव्य कॅण्डल मार्चने दिला शिक्षण व्यवस्थेला जागे होण्याचा इशारा..
अमळनेर : विक्की जाधव .
शिक्षण व्यवस्थेतील वाढत्या अनागोंदीचा निषेध, विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांचे संरक्षण आणि पारदर्शक, भ्रष्टाचारमुक्त शिक्षण व्यवस्थेच्या मागणीसाठी NSUI, अमळनेरच्या वतीने सोमवारी शहरात भव्य कॅण्डल मार्च काढण्यात आला. बळीराजा स्मारक येथून सुरू झालेली ही शांततापूर्ण रॅली छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे समारोपास आली. हातात मेणबत्त्या आणि न्यायाच्या घोषणा देत विद्यार्थी, शिक्षक, पालक, सामाजिक कार्यकर्ते तसेच संविधानप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या वेळी माजी आमदार बी. एस. पाटील, उपनगराध्यक्ष प्रशांत निकम, NSUI जिल्हाध्यक्ष ॲड. कौस्तुभ पाटील यांच्यासह विविध सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. वक्त्यांनी शिक्षण क्षेत्रातील गैरप्रकारांवर कठोर कारवाई करून गुणवत्तापूर्ण, पारदर्शक व विद्यार्थीहिताचे धोरण राबविण्याची मागणी केली. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. उपस्थितांनी दोन मिनिटे मौन पाळून त्यांच्या स्मृतींना अभिवादन केले आणि “विद्यार्थ्यांच्या न्यायासाठीचा संघर्ष न्याय मिळेपर्यंत सुरूच राहील,” असा निर्धार व्यक्त करत कॅण्डल मार्चची सांगता झाली.