अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची शेतकऱ्यांना भरपाई देण्याची उबाठा सेनेची मागणी..
अमळनेर : विक्की जाधव.
तालुक्यात 15 व 16 ऑगस्ट रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे नांद्री, पातोंडा, सोनखेडी, दापोरी, खोशी, खेडी, अमळगावसह अनेक गावांतील शेती पाण्याखाली जाऊन मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पावसाच्या पाण्याने शेतजमिनी वाहून गेल्या असून उभ्या पिकांचे नुकसान झाले आहे. तसेच जुलै महिन्यातील पावसाअभावी करपलेली पिके व आता आलेल्या पुरामुळे जमीन नापीक झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

या पार्श्वभूमीवर अमळनेर तालुका शिवसेना (उद्धव ठाकरे गट) तर्फे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. सरसकट पंचनामे करून ई-पीक पाहणीची अट रद्द करावी व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
प्रशासकीय यंत्रणेने तात्काळ कार्यवाही न केल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दिला. निवेदनावेळी सर्व शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.