गणेशोत्सव–ईद पूर्व शांतता समितीची बैठक गाजली, लोकप्रतिनिधींची खुर्ची मात्र रिकामी!
अमळनेर : विक्की जाधव.
आगामी गणेशोत्सव व ईद सणाच्या पार्श्वभूमीवर अमळनेर पोलीस स्टेशनतर्फे शांतता समितीची बैठक पार पडली. मंचावर प्रांताधिकारी नितीन मुंडावरे, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तुषार नेरकर, महावितरण अधिकारी तसेच नगरसेवक, गणेश मंडळांचे अध्यक्ष–सदस्य व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. मात्र या महत्त्वाच्या बैठकीत आजी–माजी आमदार व अनेक लोकप्रतिनिधींची अनुपस्थिती नागरिकांच्या चर्चेचा विषय ठरली.

बैठकीत नागरिकांनी थेट नगरपालिकेच्या सीओंना धारेवर धरत, भुयारी गटारीसाठी खणलेले रस्ते तातडीने दुरुस्त करून चालण्यायोग्य करावेत, अशी ठाम मागणी केली. महावितरणच्या अधिकाऱ्यांकडेही वीजपुरवठा अखंड ठेवण्याची विनंती करण्यात आली. “गणेशोत्सव हा आनंदाचा उत्सव आहे, तो शांततेत आणि उत्साहात साजरा व्हावा यासाठी प्रशासनाने गंभीरतेने काम करावे,” असे मत गणेश मंडळांनी नोंदवले.

दरम्यान, स्थानिक लोकप्रतिनिधींच्या अनुपस्थितीबाबत गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. “शहरात मोठे सण येत असताना प्रशासन आणि नागरिकांसोबत लोकप्रतिनिधी सहभागी झाले नाहीत, हे खेदजनक आहे. त्यांना अशा बैठकीला वेळ नसतो का?” असे खुलेपणाने बोलून दाखवण्यात आले.
खासदार स्मिता वाघ अनुपस्थित असल्या तरी त्यांच्या प्रतिनिधिक स्वरूपात भैरवी पलांडे वाघ यांनी मात्र हजेरी लावून गणेश मंडळे व प्रशासनाशी संवाद साधला.