खान्देश शिक्षण मंडळात वादंग – अध्यक्षांच्या घोषणांना कार्यकारी मंडळाचा विरोध, निवेदन प्रसिद्
अमळनेर विक्की जाधव.
खान्देश शिक्षण मंडळात अध्यक्ष जितेंद्र शांतीलाल झाबक यांनी अचानक केलेल्या निवडणूक कार्यक्रमाच्या घोषणेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. संस्थेचे कार्याध्यक्ष व चिटणीस यांनी स्पष्ट खुलासा केला आहे की अध्यक्षांनी केलेल्या कोणत्याही घोषणा या त्यांची वैयक्तिक बाब असून त्यास कार्यकारी मंडळाची संमती नव्हती आणि नाही.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, अध्यक्षांनी दिनांक 14 ऑगस्ट 2025 रोजी कार्यकारी मंडळाची त्रैवार्षिक निवड घेण्याचे आदेश चिटणीसांना दिले होते. परंतु सचिवांनी 16 ऑगस्ट रोजीच त्यास उत्तर देऊन तातडीने निवडणूक घेण्यात येणाऱ्या अडचणी स्पष्ट केल्या. त्यानंतरही अध्यक्षांनी 18 ऑगस्ट रोजी शेकडो सभासदांना संस्थेच्या कार्यालयात येण्याचे सुचवून पुन्हा पत्र जारी केले.
संस्थेच्या घटनेनुसार आणि निवडणूक नियमावलीनुसारच निवडणुकीची प्रक्रिया पार पडणे बंधनकारक असल्याने अध्यक्षांनी केलेल्या घोषणांना ‘घटनाबाह्य व आततायी’ ठरवत कार्यकारी मंडळाने ती फेटाळली आहे. कार्याध्यक्ष व सचिवांनी स्पष्ट केले की अध्यक्षांची एकतर्फी घोषणा संस्थेवर, कार्यकारी मंडळावर वा सभासदांवर कोणत्याही प्रकारे बंधनकारक राहणार नाही.
दरम्यान, अध्यक्ष जितेंद्र झाबक यांनी आज दुपारी 12 वाजता अमळनेर येथील प्रताप कॉलेज परिसरात सर्व सभासद व नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. या घडामोडीमुळे खान्देश शिक्षण मंडळात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले असून, सभासदांमध्येही मोठी चर्चा रंगली आहे.
संस्थेच्या इतिहासात अध्यक्ष व कार्यकारी मंडळात उभा ठाकलेला हा संघर्ष नेमका कोणत्या वळणावर थांबतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.