प्रा. जयश्री साळुंके-दाभाडे यांना इतिहास विषयात पीएच.डी. पदवी प्राप्त
अमळनेर : विक्की जाधव.
सामाजिक कार्यकर्त्या, पत्रकार आणि प्राध्यापिका प्रा. जयश्री दाभाडे यांना “डॉक्टरेट ऑफ फिलॉसॉफी (Ph.D.) इन हिस्ट्री” ही पदवी मालवांचल विद्यापीठ, इंदोर येथून प्रदान करण्यात आली. त्यांचा संशोधन विषय होता — “स्वातंत्र्य चळवळीतील सामाजिक आणि धार्मिक सुधारणा चळवळी” (Social and Religious Reform Movements in India during Freedom Struggle).
या प्रबंधामध्ये स्वातंत्र्य संग्रामाच्या पार्श्वभूमीवर महिलांवरील अन्यायकारी प्रथा आणि अस्पृश्यतेच्या विरोधात उभ्या राहिलेल्या चळवळींचा इतिहास मांडण्यात आला आहे. राजा राम मोहन रॉय, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, ईश्वरचंद्र विद्यासागर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, राजर्षी शाहू महाराज यांसारख्या समाजसुधारकांनी महिलांच्या व अस्पृश्यांच्या सक्षमीकरणासाठी केलेले कार्य, शिक्षणाच्या माध्यमातून घडवलेली क्रांती, या सर्व बाबींचा समावेश त्यांच्या प्रबंधात करण्यात आला आहे.
प्रा. साळुंके यांच्या मार्गदर्शक म्हणून डॉ. देविदास राठोड यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्या या यशामध्ये दिवंगत पती कै. राजेंद्र साळुंके, आई सौ. ठगुबाई दाभाडे, दोन्ही मुली व जावई, बहीण ॲड. निशा चव्हाण आणि भाऊ श्री. सतीश दाभाडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच रुक्मिणीताई कला व वाणिज्य महिला महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष मा. विजय नवल पाटील, कार्याध्यक्ष अनिकेत पाटील, प्राचार्य, प्रशासकीय अधिकारी आणि सर्व कर्मचारी वर्ग यांचेही सहकार्य लाभले.
प्रा. डॉ. जयश्री साळुंके यांची प्रतिक्रिया :
“ही पीएच.डी. पदवी मी २५ वर्षांपूर्वी घेणं अपेक्षित होतं, पण सामाजिक कार्यात गुंतल्यामुळे शिक्षण पूर्ण होऊ शकलं नाही. गेल्या ३–४ वर्षांत स्वतःच्या प्रगतीकडे लक्ष केंद्रित करत या शैक्षणिक पदवीची पूर्ती केली. फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारसरणीवर चालणं हे सोपं नाही, पण प्रामाणिकपणा, निस्वार्थी काम, जिद्द आणि इच्छाशक्तीच्या जोरावर मी ही वाट यशस्वीरित्या पार केली आहे.”
प्रा. डॉ. साळुंके-दाभाडे यांच्यावर विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय आणि पत्रकारितेतील क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.