संकटातून सावरलेले वाडी संस्थान आता भक्तांच्या सेवेसाठी सज्ज; आषाढीला भाविकांचा महासागर लोटणार
अमळनेर : विक्की जाधव
आषाढी (देवशयनी) एकादशीनिमित्त अमळनेर तालुक्यातील वाडी संस्थान भाविकांच्या स्वागतासाठी पूर्णपणे सज्ज झाले आहे. संपूर्ण महाराष्ट्राला लाभलेल्या वारकरी संप्रदायाच्या अखंड परंपरेचा साक्षीदार ठरणारा हा सोहळा यंदाही मोठ्या भक्तिभावात पार पडणार असून अमळनेर शहरासह तालुक्यातील विविध गावांतून हजारो वारकरी आणि भाविक विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी वाडी संस्थानात दाखल होणार आहेत. मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून दर्शनासाठी आवश्यक सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे.
ग्रामीण भागातून अनेक दिंड्या टाळ-मृदंगाच्या गजरात, अभंग आणि हरिनामाचा जयघोष करत पायी वाडी संस्थानाकडे प्रस्थान करतात. वारकऱ्यांच्या डोक्यावर तुळशीवृंदावन, भगव्या पताका आणि मुखी “विठ्ठल… विठ्ठल…”चा अखंड गजर असा भक्तिरसाचा अविस्मरणीय संगम येथे अनुभवायला मिळतो. वारकरी परंपरेचे जतन करणारा हा सोहळा भाविकांसाठी श्रद्धा, भक्ती आणि समतेचा संदेश देणारा ठरतो.
मागील काळात शॉर्टसर्किटमुळे वाडी संस्थानात भीषण आग लागून मोठे नुकसान झाले होते. मात्र त्या संकटावर यशस्वीपणे मात करत संस्थानने अल्पावधीतच मंदिर परिसराची पुनर्बांधणी व सुशोभीकरण करून तो पुन्हा भाविकांसाठी खुला केला आहे. त्यामुळे यंदाची आषाढी एकादशी विशेष ठरणार असून हजारो भाविकांच्या उपस्थितीत वाडी संस्थान पुन्हा एकदा विठ्ठल भक्तीच्या उत्साहाने दुमदुमून जाणार आहे.