इंदापूर तालुक्यातील जंक्शन एमआयडीसी विस्ताराचा मार्ग मोकळा; १००० एकर जमीन हस्तांतरणाबाबत महत्त्वपूर्ण बैठक संपन्न – कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती.
स्वर्गीय अजितदादा पवार यांचे स्वप्न होणार साकार.
(निलेश गायकवाड)
आज पावसाळी अधिवेशनात इंदापूर तालुक्यातील जंक्शन वालचंदनगर औद्योगिक क्षेत्राच्या तिसऱ्या टप्प्याच्या विकासासाठी महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या रत्नपुरी मळ्यातील सुमारे १००० एकर जमीन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे (एमआयडीसी) हस्तांतरित करण्याबाबत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
या बैठकीत जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्यासाठी आवश्यक प्रशासकीय आणि तांत्रिक बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आली. महसूल विभाग, एमआयडीसी, महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ, पुणे जिल्हा प्रशासन तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
इंदापूर परिसरातील औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी आणि भविष्यातील गुंतवणुकीसाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा ठरणार असल्याचे माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
बैठकीत संबंधित विभागांना आवश्यक कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, जमीन हस्तांतरण प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी दूर करून प्रकल्पाला गती देण्यावर भर देण्यात आला.
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले,स्वर्गीय अजितदादा पवार यांनी या संदर्भात पुढाकार घेऊन जंक्शन एमआयडीसी मंजूर केली होती.त्यामुळे
“इंदापूर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी औद्योगिक क्षेत्राचा विस्तार अत्यंत महत्त्वाचा आहे. उद्योगवाढीमुळे स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील आणि परिसराच्या आर्थिक प्रगतीला चालना मिळेल. राज्य शासनाच्या समन्वयातून हा प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी आवश्यक ती सर्व मदत करण्यात येईल.यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, व उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार यांचे देखील आभार मंत्री भरणे यांनी मानले.
यावेळी वसंत मोहोळकर,विष्णू माने,दत्तात्रय फडतरे,हर्षवर्धन गायकवाड ,विष्णू माने ,उद्धव माने,अभिषेक माने,तसेच महसूल विभागाचे सचिव,उपसचिव,मंत्रालयीन अधिकारी,एमआयडीसीचे अधिकारी,आदी उपस्थित होते.