संजय गांधी विभागातील कर्मचाऱ्याची कामगिरी ठरली आदर्श; जगदीश पाटील यांना सलग तिसरा ‘उत्कृष्ट कर्मचारी’ पुरस्कार
अमळनेर : विक्की जाधव.
तहसील कार्यालयातील संजय गांधी विभागाचे कर्मचारी श्री. जगदीश दादा पाटील यांना उत्कृष्ट व कर्तव्यदक्ष सेवेसाठी जळगावचे जिल्हाधिकारी रोहन घुगे तसेच पालकमंत्री यांच्या हस्ते ‘उत्कृष्ट कर्मचारी’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विशेष म्हणजे, सलग तिसऱ्यांदा हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळवत त्यांनी आपल्या उत्कृष्ट कार्याची हॅटट्रिक पूर्ण केली आहे.
संजय गांधी निराधार, श्रावणबाळ, अपंग, विधवा, वयोवृद्ध तसेच विविध शासकीय योजनांतील लाभार्थ्यांना वेळेवर, पारदर्शक आणि संवेदनशील सेवा देण्यात जगदीश पाटील यांनी सातत्याने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सर्वसामान्य नागरिक आणि गरजू लाभार्थ्यांशी आत्मीयतेने वागण्याच्या त्यांच्या कार्यशैलीमुळे त्यांना हा सन्मान प्राप्त झाल्याचे मानले जात आहे.
सलग तिसऱ्यांदा मिळालेला हा पुरस्कार अमळनेर तहसील कार्यालयासाठीही अभिमानाची बाब ठरली असून, त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या पुढील सेवाकार्यासाठी शुभेच्छा व्यक्त करत, अशाच समर्पित कार्यातून अधिकाधिक जनतेची सेवा त्यांच्या हातून घडावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.