नव्या वर्षाचा नवा अध्याय : डॉ. परीक्षित बाविस्कर यांनी हजारोंच्या साक्षीने स्वीकारला नगराध्यक्षपदाचा पदभार..
अमळनेर : पत्रकार, विक्की जाधव.
अमळनेर नगरपरिषदेच्या इतिहासात भूतो ना भविष्य असा क्षण साकारत, लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. परीक्षित श्रीराम बाविस्कर यांनी नववर्षाच्या शुभमुहूर्तावर भव्य जनसमुदायाच्या उपस्थितीत पदभार स्वीकारला. हजारो मतदार, हितचिंतक, कार्यकर्ते व नागरिकांच्या साक्षीने झालेल्या या सोहळ्याने अमळनेर शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. विजय मिरवणूक व पदभार स्वीकार सोहळ्यात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता, हा केवळ एका व्यक्तीचा नव्हे तर संपूर्ण अमळनेरकरांचा विजय असल्याची भावना व्यक्त होत होती.

शहर सुशोभीकरण व मूलभूत सुविधांवर भर जनतेला संबोधित करताना डॉ. परीक्षित बाविस्कर यांनी आपल्या विकासदृष्टीकोनाचा स्पष्ट आराखडा मांडला. अमळनेर शहराचे सुशोभीकरण, गटारी-नाले, शहरातून जाणाऱ्या बोरी नदीची साफसफाई, पाणीपुरवठ्याचा प्रश्न, वैद्यकीय सेवेसाठी प्रशस्त रुग्णालय ही उभारणार व नागरिकांना वेळेवर शुद्ध पाणी देणे हे त्यांच्या कार्यकाळातील प्राधान्यक्रम असतील, असे त्यांनी ठामपणे सांगितले. “अमळनेरचा चेहरा-मोहरा बदलण्याचा संकल्प केला असून विकास हा केवळ घोषणांपुरता न राहता प्रत्यक्षात दिसेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मानधन गोसेवा व समाजकार्यास अर्पण आदर्श निर्णय.
आपल्या संपूर्ण कार्यकाळात नगराध्यक्ष म्हणून मिळणारे शासकीय मानधन गोसेवा व सामाजिक संस्थांना देण्याचा संकल्प त्यांनी जाहीर करत, समाजासमोर एक आदर्श निर्माण केला. कोणत्याही पद, पैसा किंवा सत्तेची लालसा नसलेले, समाजहितासाठी झटणारे नेतृत्व म्हणून डॉ. बाविस्कर यांच्याबद्दल नागरिकांमध्ये विशेष आपुलकी दिसून आली.
पालकमंत्र्यांचा शब्द, उपमुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा.
या वेळी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील यांनी मंचावरून विकासाचा विश्वास दिला. “अमळनेरमध्ये विकासकामांची गंगा वाहील, निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही,” असे त्यांनी स्पष्ट करत, “आम्हाला असा इंजेक्शन देणारा डॉक्टरच हवा होता,” अशा शब्दांत डॉ. बाविस्कर यांच्या कार्यशैलीचे कौतुक केले. तर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी दूरध्वनीद्वारे जनतेसमोर डॉ. बाविस्कर यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
‘हा विजय अमळनेरकरांचा’ मा. आ. शिरीष दादा चौधरी.
माजी आमदार शिरीष चौधरी यांनीही जनतेला संबोधित करताना “हा विजय माझा किंवा डॉ. परीक्षित बाविस्कर यांचा नसून समस्त अमळनेरकरांचा आहे,” असे सांगत त्यांनी हा विजय अमळनेर शहराला समर्पित केला. “धन्यवाद अमळनेर, दिलेल्या संधीचे सोने करून दाखवू,” असे भावनिक शब्द त्यांनी मंचावरून उच्चारले. यावेळी माजी आमदार डॉक्टर बी एस पाटील. अँड. ललिता शाम पाटील. सेनेचे जिल्हाअध्येक्ष. निवडून आलेले नगरसेवक-नगरसेविका, शिवसेना पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, पत्रकार आणि हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते. नव्या नेतृत्वाकडून आता अमळनेरच्या शाश्वत विकासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.