संत साहित्य मानवास निसर्गाशी एकरूप करते — डॉ. विनोद ऊपर्वट यांचे प्रतिपादन
अमळनेर : विक्की जाधव.
“तंत्रज्ञानाच्या वेगवान युगातही संतांचे विचार आजही तितकेच जीवनस्पर्शी आणि पर्यावरणपूरक आहेत,” असे प्रतिपादन डॉ. विनोद ऊपर्वट (धुळे) यांनी केले. खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय (स्वायत्त) अमळनेर येथे मराठी विभागातर्फे ‘अभिजात भाषा पंधरवाडा’ निमित्त आयोजित अतिथी व्याख्यानमालेच्या पहिल्या सत्रात ते बोलत होते. ‘संत साहित्यातील पर्यावरण’ या विषयावर त्यांनी संतांच्या निसर्गदृष्टीचा आणि मानव-निसर्ग नात्याचा सखोल वेध घेतला.

डॉ. ऊपर्वट यांनी आपल्या प्रभावी व्याख्यानातून सांगितले की, “संत साहित्य माणसाला केवळ अध्यात्म शिकवत नाही, तर निसर्गाशी एकरूप होण्याची शिकवण देते.” त्यांनी संतांनी अभंग, ओव्या आणि कीर्तनांद्वारे दिलेल्या पर्यावरण संवर्धनाच्या संदेशाचे महत्त्व अधोरेखित केले. संतांची विचारधारा ही आजच्या पर्यावरण संकटाच्या पार्श्वभूमीवर दिशादर्शक असल्याचे ते म्हणाले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डॉ. एच. डी. जाधव होते. त्यांनी विद्यार्थ्यांना संत साहित्याचा अभ्यास करून जीवनात त्या मूल्यांची अंमलबजावणी करण्याचे आवाहन केले. प्रास्ताविक मराठी विभागप्रमुख डॉ. ज्ञानेश्वर कांबळे यांनी केले, सूत्रसंचालन प्रा. गोपाल बडगुजर यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. सागर सैंदाणे यांनी केले. या वेळी प्रा. रमेश माने, डॉ. विलास गावित, प्रा. योगेश पाटील यांसह प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.