होमगार्डना न्याय मिळावा अमळनेरात बच्चू कडू यांना निवेदन..
अमळनेर : विक्की जाधव.
अमळनेर येथे आमदार बच्चू कडू यांना होमगार्ड सैनिकांच्या हक्क आणि न्याय्य मागण्यांसाठी निवेदन देण्यात आले. जिल्हा जळगावातील होमगार्ड सैनिकांनी या निवेदनाद्वारे आपल्या सेवांबाबत शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी केली आहे.

निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, सर्व होमगार्ड सैनिकांना वर्षभर म्हणजेच ३६५ दिवस काम मिळावे, “निष्काम सेवा” हे ब्रीदवाक्य बदलून नवीन धोरण लागू करावे तसेच १९४७ चा जुना होमगार्ड अधिनियम रद्द करून नवीन मसुदा तयार करावा अशी मागणी करण्यात आली. तसेच सलग पाच वर्षे सेवा बजावलेल्या होमगार्डना पोलीस शिपाई किंवा अमलदार पदासाठी थेट नियुक्तीची संधी मिळावी, असेही मागण्यात आले आहे. याशिवाय राज्य शासन कर्मचाऱ्यांप्रमाणे सोयीसुविधा, समान काम समान वेतन, पूर्ण विमा संरक्षण, पेन्शन स्वरूपात दरमहा १५,००० रुपये आणि सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षे करण्यात यावे, अशा दहा प्रमुख मागण्या या निवेदनात समाविष्ट आहेत. आमदार बच्चू कडू यांनी या मागण्यांबाबत शासनाच्या पातळीवर योग्य तो पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिल्याचे सांगण्यात आले.