परंपरेचा अखंड दीप — वाकळीतील तरुणांचा ४५० कि.मी. अनवाणी प्रवास
अमळनेर : विक्की जाधव.
जामनेर तालुक्यातील वाकळी गावातील सर्वधर्मीय तरुणांनी वडिलोपार्जित परंपरा जपण्यासाठी या वर्षीही थरारक अनवाणी प्रवास करून परंपरेचा दीप पुन्हा प्रज्वलित केला आहे. गुजरातमधील पंचमहल जिल्ह्यातील पावागड महाकालिका माता मंदिरातून आणलेली अखंड ज्योत घेऊन हे तरुण तब्बल ४५० कि.मी.चा पायी प्रवास करत नवरात्राच्या पहिल्या दिवशी वाकळीत दाखल होणार आहेत.

या प्रवासात अडचणी, थकवा, कष्ट असूनही गावाचा इतिहास, एकोप्याची परंपरा आणि श्रद्धेचा ज्योतिप्रकाश जिवंत ठेवण्यासाठी तरुणांनी हे आव्हान पेलले. या ज्योतीच्या ज्वालेतूनच प्रत्येक घरात घटस्थापना केली जाते, हेच या परंपरेचे वैशिष्ट्य आहे.
२० रोजी अमळनेरच्या प्रसिद्ध श्री मंगळग्रह मंदिरात दाखल झाल्यावर मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले यांनी या तरुणांचे उत्साहाने स्वागत केले. संस्थेतर्फे निवास व भोजनाची सोय करण्यात आली. विशेष म्हणजे या अखंड ज्योतीतील एक ज्योत मंगळग्रह मंदिरात नवरात्र उत्सवासाठी विधिपूर्वक प्रज्वलित करण्यात आली आहे.