अमळनेर तालुक्यात नद्यांना दुथळी पाणी – तहसीलदार व प्रांताधिकारींच्या धडाकेबाज कारवाईने वाळूचोरांचे धाबे दणाणले
अमळनेर : विक्की जाधव.
तालुका पावसाने अक्षरशः तुडुंब भरून गेला आहे. तापी, बोरी व पांझरा या प्रमुख नद्यांना दुथळी पाणी आल्याने शेतकरी आणि नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला आहे. बऱ्याच दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या पावसाने दमदार हजेरी लावत नद्या, बंधारे आणि शेतजमिनींना जीवनदान दिलं आहे. मात्र याच सत्रात पावसाचे पाणी वाहून आल्यानंतर वाळू तस्करीचा प्रश्न डोकं वर काढणार, अशी भीती होती. पण अमळनेर प्रशासनाच्या कडक पावलंमुळे या वेळी चित्र वेगळंच दिसून आलं.
तहसीलदार रुपेशकुमार सुराणा आणि प्रांताधिकारी नितीन मुंडावरे यांनी वाळू तस्करी रोखण्यासाठी गावोगावी पोलीस पाटीलांच्या मदतीने विशेष पथकांची उभारणी केली आहे. यामुळे वाळू चोरांचे मनोबल खच्चीकरण झालं असून, त्यांच्या बेकायदेशीर हालचालींना आळा बसला आहे. इतकंच नव्हे तर किरकोळ टेम्पोने वाळू वाहतूक करणाऱ्यांनाही धडा शिकवण्यात आला आहे.
याचबरोबर, रात्रीच्या वेळीही तलाठी व पोलीस पाटील यांचे बैठे पथक तैनात करून सतत नजर ठेवली जाते आहे. प्रशासनाकडून नव्याने उभारलेले बंधारे भरगच्च पाण्याने खळखळून वाहत आहेत, परंतु तरीसुद्धा वाळू चोरीचा प्रश्न नियंत्रणाखाली ठेवण्यात यश आलं आहे. ग्रामीण भागातील नागरिकांनी याला सकारात्मक प्रतिसाद देत प्रशासनाच्या या कार्याची दाद दिली आहे.
बांधकाम व्यवसायिक व घरकुल बांधणाऱ्यांसाठी सध्या एरंडोल तालुक्यातील हनुमंतखेडा, उत्राण व निझर येथील शासकीय वाळू नियमाने उपलब्ध करून दिली जात आहे. यामुळे अवैध वाळू उपशावर मोठा लगाम बसला आहे. मागील महिन्यात तहसीलदार, प्रांताधिकारी, तलाठी व पोलीस पाटील यांच्या संयुक्त कारवाईने वाळू तस्करांवर चपराक बसली होती. आता या धडाकेबाज कारवाईने प्रशासनाने “आम्ही तयार आहोत” असा ठाम संदेश दिला आहे.