एकतर जुळत नाही… जुळलं तर टिकत नाही! शोध वैवाहिक समस्यांचा उपक्रम मोठ्या उत्साहात संपन्न..
अमळनेर : विक्की जाधव
लाड शाखीय वाणी समाज पंच मंडळ, अमळनेर व विवाह संस्कृती परिवार, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने ‘शोध वैवाहिक समस्यांचा’ हा विशेष सामाजिक उपक्रम दिनांक २७ जुलै २०२५ रोजी अमळनेर येथील लाड शाखीय वाणी समाज मंगल कार्यालयात मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. नितीन रंगनाथ देव (देवाची आळंदी, पुणे) होते. कार्यक्रमाची संकल्पना सौ. रेखा नरेंद्र कोतकर (संस्थापक – विवाह संस्कृती परिवार, नाशिक) यांची होती. कार्यक्रमाची सुरुवात नाशिक येथील महिला मंडळाच्या घोषवाक्य व ओवीने करण्यात आली. त्यानंतर समाज प्रबोधनपर नाटिका, कीर्तन, भारूड, पोवाडा आणि वादसंवाद सादर करण्यात आले.

प्रमुख मार्गदर्शक वक्ते डॉ. सौ. भाग्यश्री शिनकर (मानसोपचार तज्ज्ञ, चाळीसगाव) यांनी “सुखी संसारासाठी सामंजस्य आवश्यक असून तडजोडीने प्रेम वृद्धिंगत होते” असे मत व्यक्त केले. सौ. अनिता कासोदेकर (पुणे) यांनी “मोबाईलचा वापर सजगतेने करावा, तो घटस्फोटाचे कारण होऊ नये” असे मत मांडले. श्री. महेश कोठावदे (अधिक्षक, जिल्हा सत्र न्यायालय, जळगाव) यांनी लग्नपूर्व समुपदेशनाचे महत्त्व सांगितले. अँड. प्रविण अमृतकार (नाशिक) यांनी “आई व सासू यांनी नवविवाहितांच्या संसारात ढवळाढवळ करू नये” असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमात प्रमुख वक्ते व मान्यवरांचा पंच मंडळातर्फे सन्मानचिन्ह, शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन प्रा. पी. एल. मेखा व नीलिमा कुडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पंच मंडळ अध्यक्ष नितीन भदाणे, उपाध्यक्ष मंगला शिरोडे, सेक्रेटरी प्रकाश अमृतकर, सहसेक्रेटरी पंकज मराठे, खजिनदार योगेश येवले व सदस्य जितेंद्र राणे, विनोद कोठावदे, सुनील मोराणकर, सुनील भामरे, संजय भामरे, सौ. वनिता महिंद, सुयोग महिला मंडळ अमळनेर व लाड शाखीय वाणी समाज महिला मंडळ यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अध्यक्ष नितीन भदाणे यांनी केले. विशेष म्हणजे, या कार्यक्रमाचे फेसबुक व युट्युबवर थेट प्रक्षेपण करण्यात आले असून सुमारे ५०० लोकांनी घरबसल्या सहभाग घेतला.