मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील मोठा निकाल: 11 आरोपी निर्दोष ठरले

मुंबई,प्रतिनिधी – वर्षा चव्हाण
मुंबई, 21 जुलै 2025 – मुंबईतील 2006 च्या भीषण लोकल बॉम्बस्फोट प्रकरणात आज उच्च न्यायालयाने मोठा आणि ऐतिहासिक निकाल दिला आहे. तब्बल 19 वर्षांनंतर, या प्रकरणातील 11 आरोपींना न्याय मिळाला असून न्यायालयाने त्यांना निर्दोष ठरवत मुक्त करण्याचा आदेश दिला आहे.
न्यायमूर्ती अनिल किलोर आणि न्यायमूर्ती एस. चांडक यांच्या खंडपीठाने हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला. या साखळी बॉम्बस्फोटांमध्ये एकूण 209 निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला होता, तर 800 हून अधिक जखमी झाले होते. 11 जुलै 2006 रोजी संध्याकाळच्या वेळेस केवळ 11 मिनिटांत चर्चगेट ते बोरिवलीदरम्यानच्या विविध लोकल ट्रेनमध्ये पाच ठिकाणी स्फोट झाले होते.
या स्फोटांमध्ये कुकर बॉम्बचा वापर करण्यात आल्याचं निष्पन्न झालं होतं. मात्र, पोलिस व तपास यंत्रणांकडून न्यायालयात याबाबत ठोस पुरावे सादर करण्यात अपयश आल्याचं न्यायालयाने नमूद केलं. त्यामुळे सर्व 11 आरोपी निर्दोष सुटले आहेत.
या निर्णयामुळे तपास यंत्रणांवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून, न्याय व्यवस्थेतील दोष आणि तपास प्रक्रियेतील त्रुटींवर पुन्हा एकदा प्रकाश पडला आहे. या प्रकरणाच्या पुर्नतपासणीची मागणी होण्याची शक्यता असून, राज्य सरकार काय निर्णय घेणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.