अमळनेर तालुक्यात प्रशासन शिथिल – निराधार कार्यालयाला कुलूप, नागरिक हैराण
अमळनेर : विक्की जाधव.
अमळनेर तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणा सध्या बेफिकीर आणि बेजबाबदार वागणुकीमुळे टीकेच्या धनी बनत आहे. संजय निराधार योजनेच्या कार्यालयास कुलूप, कर्मचारी जागेवर अनुपस्थित आणि कार्यालयीन वेळेत काम टाळण्याचा प्रकार उघड झाला आहे. या परिस्थितीमुळे ज्येष्ठ नागरिक व गरजूंना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागत आहे.
तालुक्याच्या ग्रामीण भागासह शहरातील सामान्य नागरिकांना विविध शासकीय योजनांसाठी वारंवार कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. मात्र संबंधित अधिकारी आणि कर्मचारी वेळेवर कार्यालयात उपस्थित राहत नसल्याने, नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत होत चालला आहे.

विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना आधार, निवृत्तीवेतन, निराधार योजना, अपंग सवलती यासाठी संजय निराधार योजनेच्या कार्यालयात जावे लागते. परंतु कार्यालयास कुलूप असल्याने ते वेळोवेळी परत पाठवले जातात, हे दृश्य आता सर्रास दिसून येते.
यामुळे एकच प्रश्न सर्वत्र विचारला जात आहे – या बेजबाबदार कर्मचाऱ्यांवर कुणाचाही वचक राहिला आहे का? संबंधित अधिकाऱ्यांनी या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देऊन कार्यपद्धतीत शिस्त आणावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.
🔴 प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सामान्यांचे हाल – जबाबदारी कुणाची?