अमळनेरमध्ये वीज पुरवठ्याचा लपंडाव अधिकाऱ्यांचा दुर्लक्षाने नागरिक संतप्त!
अमळनेर : विक्की जाधव
अमळनेर शहरात सध्या विजेचा लपंडाव सुरू असून, महावितरणच्या अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा नागरिकांच्या सहनशक्तीचा अंत पाहतो आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता वारंवार वीज खंडित केली जात असल्याने संपूर्ण शहरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
२४ एप्रिल रोजी अखिल भारतीय ग्राहक पंचायत अमळनेर शाखेने या गोंधळाविरोधात महावितरण उपविभाग-१ चे अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री. नेमाडे यांच्या कार्यालयास भेट दिली आणि निवेदनातून सांगितले की, नागरिकांना त्रास सहन करावा लागू नये म्हणून वीजपुरवठा सुरळीत ठेवावा अन्यथा शहरातील संतप्त नागरिक तीव्र आंदोलन करतील असा इशारा देण्यात आला.
ग्राहक पंचायतीने स्पष्टपणे नमूद केले आहे की, शहरातील कोणत्याही भागात उच्चदाब वा लघुदाब वाहिनीच्या दुरुस्तीच्या नावाखाली अचानक वीज तोडली जाते. यामुळे लोकांना नळाद्वारे पाणी भरणे अशक्य होते, उन्हाच्या तीव्र झळांमध्ये घरात कुलर-पंखे बंद पडतात, आणि वयोवृद्ध, गृहिणी व बालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो.
अधिकाऱ्यांची बेजबाबदार वृत्ती इतकी वाढली आहे की कार्यालयीन क्रमांकावर फोन केला तरी प्रतिसाद मिळत नाही; अधिकारी फोन घेण्याचेही कष्ट घेत नाहीत. नागरिकांच्या तक्रारींकडे कानाडोळा केला जात असल्याचा आरोप ग्राहक पंचायतीने ठामपणे लावला आहे.
या निवेदनप्रसंगी सौ. स्मिता चंद्रात्रे (अध्यक्ष), अॅड. सौ. भारती अग्रवाल (महिला प्रांत प्रमुख), सौ. वनश्री अमृतकर (सचिव), मकसूद बोहरी (जिल्हा पालक), विजय शुक्ल (जिल्हा सायबर व बँकिंग प्रमुख), सुनील वाघ (ऊर्जा प्रमुख) व सतीश देशमुख (जिल्हा उपसचिव) यांनी अधिकाऱ्यांना थेट इशारा दिला की, जर त्वरित सुधारणा झाली नाही तर तीव्र आंदोलने उभारली जातील.
असे पीआरओ सौ. मेहराज बोहरी यांनी कळवले.