हार टाळण्यासाठी माघार ?
हा तर पुढील घोडदौडीचा शुभ संकेत !
पराभव डोक्यावर घिरट्या घालत असताना हटवादीपणे निवडणूक लढवून हाराकिरी पत्करण्या ऐवजी भाजपाने प्रथमच सामंजस्यपणे अंधेरी विधानसभा मतदार संघातून माघार घेतली.हे दृष्य आजच्या गढूळलेल्या राजकारणातील समाधानाची बाब आहे.ऋतुजा रमेश लटके यांचा राजिनामा अडवण्यापासून त्यांच्या विरोधात त्या महापालिकेत अनुपस्थित असूनही ऐनवेळी भ्रष्टाचाराची तक्रार करणे, नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या वेळेस केलेले शक्ती प्रदर्शन, या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर भाजपाला महाराष्ट्राच्या संस्कृतीचा साक्षात्कार घडावा तोही स्वयंप्रेरणे नव्हे तर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे,राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व आमदार प्रतापी नाईक यांच्या विनंतीवरून भाजपाला जाग आली.अखेरीस घोडं गंगेत न्हालं आणि भाजपाचे उमेदवार मुरजी पटेल यांनी माघार घेतल्याचे प्रवक्ते बावनकुळे यांनी जाहिर करून तणाव व संघर्ष टाळला, हे एकाअर्थी बरेच झाले.
आत्ता शिवसेना उद्धव ठाकरे यांचा पक्ष विजयी होण्याचा मार्ग मोकळा झाला.त्यामुळे या विजयाचा आनंद साजरा करावा व उणेदुणे काढू नये. विजय अपेक्षित असल्याने त्याचा उन्माद करू नये. फक्त आनंद याचाच आहे की शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने मशाल या चिन्हावर पहिल्या वहिल्या विजयाचा जल्लोष मात्र नक्की केला पाहिजे. मिंधे गटाला येथे उमेदवारी मिळणे अपेक्षित असताना भाजपाने स्वतःचा उमेदवार देऊन मिंधे गटाला एकीकडे शह दिला व पुन्हा माघार घेत त्यांची गोची केली.भाजपाने जो दिलदारपणा दाखवला तसा दिलदारपणा दाखवला असता का ? हा प्रश्न विचारला जात आहे. सारासार विचार करता व मिंधे गटाची पाय खेचण्याची वृत्ती पाहता तसे झाले नसते असे बोलले जात आहे. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला अपशकून करण्याची त्यांची संधी हुकली,याची हळहळही उघडपणे ते व्यक्त करू शकत नाहीत.
अधिक तपशिलात न जाता,आज निश्चित दिसत असलेल्या विजयाचा निष्ठावंत शिवसैनिकांनी आनंद साजरा करावा. ऋतुजा लटके यांनी विजयाचे महाद्वार उघडले आहे,आत्ता हा अश्वमेध कोणालाही अडवता येणार नाही. हाच नियतीचा संकेत मानून पुढील जोमदार वाटचाल केली पाहिजे.
दिलीप मालवणकर
9822902470