चुकीच्या मतदार यादीत गेलेल्या मतदारांची नावे पूर्ववत करा.. अन्यथा मतदानावर सामोहिक बहिष्कार
अमळनेर : विक्की जाधव.
अमळनेर नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक 11 मधील वाडी चौक परिसरातील नागरिकांनी जोरदार संताप व्यक्त करत, आगामी निवडणुकांपूर्वी मूळ मतदान केंद्र पूर्ववत सुरू करावे आणि चुकीच्या यादीत गेलेल्या मतदारांची नावे योग्य यादीत समाविष्ट करावीत, अशी ठाम मागणी केली आहे. अन्यथा सामूहिक मतदान बहिष्काराचा इशारा दिला आहे.
वाडी चौक, गुरव गल्ली, भाजी बाजार, पुजारी गल्ली, लक्ष्मीपुरा अशा घनदाट वस्तीतील सुमारे 150 मतदारांची नावे चुकीने नदीपलीकडील गायकवाड हायस्कूल येथील प्रभाग क्रमांक 10 मध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. या भागाचा कोणताही सामाजिक वा भौगोलिक संबंध प्रभाग 10 शी नसताना, नागरिकांना जवळपास दोन किलोमीटर अंतरावर मतदानासाठी जावे लागत आहे. अश्या अश्याचे निवेदन न. पा चे मुखाधिकारी यांच्या नावे देण्यात आले आहे.
यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला व दिव्यांग मतदारांना विशेषतः मोठा त्रास सहन करावा लागतो. परिणामी, मतदानाची टक्केवारीही घटत असल्याचे स्थानिकांनी नमूद केले.
दरम्यान, वाडी संस्थान परिसरातील मूळ मतदान केंद्र मागील निवडणुकीदरम्यान बांधकामामुळे तात्पुरते मुंदडा हायस्कूल, माळीवाडा येथे हलवण्यात आले होते. परंतु आता मूळ ठिकाणी बांधकाम पूर्ण असूनही केंद्र पूर्ववत सुरू करण्यात आलेले नाही.
“आम्हाला आमच्या परिसरातीलच मतदान केंद्र हवे आहे. वाडी संस्थान परिसर पुन्हा कार्यरत करावा. नागरिकांच्या सोयीचा आणि हक्काचा विचार करून निर्णय घ्यावा, अन्यथा आम्ही मतदान बहिष्कार करू,” असा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे.
नगरपरिषद आणि निवडणूक प्रशासनाने या तक्रारींचा गांभीर्याने विचार करून तात्काळ उपाययोजना कराव्यात, अशी सर्वसामान्यांची मागणी आहे. यावेळी वाडी चौक परिसरातील असंख्य नागरिक उपस्थिती होते.