कारगिल विजय दिनानिमित्त शेटफळ गडे येथे वीर हुतात्म्यांना अभिवादन..
प्रतिनिधि:- प्रा तुषार वाबळे
देशभरात कारगिल विजय दिन हा विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येतो. कारगिलमध्ये १९९९ साली घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानी सैन्याला भारतीय जवानांनी गुडघे टेकायला लावत जगाला आपले शौर्य दाखवले होते. बर्फाच्छादित द्वास, कारगिल, बाटालिक प्रदेशात प्रतिकूल परिस्थितीत युद्ध लढून भारताने पाकला धडा शिकवला होता. घुसखोर म्हणून भारतीय हद्दीत आलेल्या पाकिस्तानी सैनिकांना हुसकावून लावण्यासाठी ऑपरेशन विजय या नावाने मोहीम हाती घेण्यात आली. सुमारे तीन महिने चाललेल्या या युद्धात २६ जुलै रोजी विजयी झाल्याची घोषणा लष्कराने केली होती. तेव्हापासून हा दिवस “कारगिल विजय दिन “म्हणून ओळखला जातो. भारतीय वायुदलाने लष्कराच्या मदतीसाठी ऑपरेशन सफेद सागर ही मोहीम राबवून कारगिल युद्धात मोलाची भूमिका पार पाडली होती. या युद्धात ५०० हून अधिक जवान शहीद झाले. या दिनाचे औचित्य साधून शेटफळगडे येथे वीर जवानांना आदरांजली वाहण्यात आली यावेळी भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करून राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यानंतर कारगिल युद्धातील वीर हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.यावेळी गावातील माजी सैनिकांनी आपली मनोगते यावेळी व्यक्त केली. शेटफळगडे पंचक्रोशीतील माजी सैनिकांबद्दल सद्भावना व्यक्त करून गावातील नागरिकांनी त्यांचा सन्मान केला .यावेळी ग्रामस्थांनी “जय जवान जय किसान ” चा नारा दिला आणि शेवटी कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम ने करण्यात आली.
या कार्यक्रमासाठी गावातील माजी सैनिक श्री मोहन वाबळे ,श्री लहूराज वाबळे ,श्री झगडे ,श्री विलास शेलार ,श्री पारंबे, श्री भोसले ,श्री गोसावी त्याचबरोबर गावातील प्रतिष्ठित ग्रामस्थ ,रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य श्री हनुमंत वाबळे , राष्ट्रवादी युवा काँग्रेसचे श्री सागर वाबळे ,ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच श्री अण्णासाहेब शिरसट ,ग्रामपंचायत चे विद्यमान सदस्य श्री माऊली भोसले ,पोलीस पाटील श्री सवाणे ,श्री अमोल झगडे ,बारामती पोलीस स्टेशनचे श्री भोसले साहेब, तसेच शेटफळगडे पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.
