अति तिथे माती होणार !
क्रांतीकारी ऑगस्ट महिन्यात अंत होणार !
(ज्येष्ठ पत्रकार दिलीप मालवणकर यांचा सडेतोड लेख )
शिवसेनेत राहून शाखाप्रमुख पदापासून कॅबिनेट मंत्री पदापर्यंत सर्व पदं उपभोगुनही समाधान न झाल्याने एकनाथ शिंदे यांनी शिवसेना व पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठित खंजीर खुपसून भाजपाशी संधान साधून पाठिजत खंजीर खुपसून दगाबाजी केली. असे दगाबाज मग हिंदूत्व, शिवसेना, दिघे साहेब यांच्या वरील निष्ठेचे आलाप आळवु लागले. ही नक्राश्रू गाळण्याचे कारण शिवसैनिक व मतदारांची सहानुभूती संपादन करणे हेच होते.
एक वेळ पक्ष सोडून अन्य पक्षात इडी,सीबीआय व आयटीच्या कचाट्यातून आपली मान सोडवण्यासाठी स्वतःला इतर पक्षाच्या दावणीला बांधुन घेतले असते तरी ते क्षम्य ठरलेही असते परंतू त्यांनी अघाश्यासारखे शिवसेना, पक्ष चिन्ह बळकावण्याचा अघोरी प्रयत्न केला या पापाला क्षमा नाही. तुम्ही या वटवृक्षाची एक फांदी होतात,तुम्हाला या वटवृक्षाने पोसले,तुम्ही त्याची फळं व लाभ मनसोक्त घेतले,आता त्या वृक्षालाच गिळायला , त्या वटवृक्षावर परकीयांच्या कु-हाडीचे दांडे बनुन घाव घालण्याचे दुष्कर्म करायला धजावलात, ही कृती मानवतेला कलंकित करणारी व हिनतेची परिसीमा ओलांडणारी आहे.इतके करून तुम्हाला गद्दार म्हटले तर राग येतो ? वास्तविक गद्दार हा शब्द तुमच्या कृतघ्नतेच्या व्यापक स्वरूपाचा विचार करता फारच सौम्य वाटतो. तुम्ही माणूस म्हणवण्याच्या योग्यतेचे नाहीत, हे शिवसैनिकांच्या आक्रोशावरून, ठिकठिकाणी फासलेले काळे,
जाळलेल्या प्रतिमा,कार्यालयांची केलेली मोडतोड व गद्दार म्हणून केलेली घोषणाबाजी कशाचे प्रतिक होते ? हे त्यांनी ओळखायला हवे, काळाची पावलं ओळखु न शकणारा नेता पराभवाच्या खाईत ढकलला जातो.त्याचा कपाळमोक्ष होतो.
एकनाथ शिंदेंसोबत गेलेले सर्वच आमदार हे राजीखुशीने गेलेले नाहीत.त्यातील अनेक आमदारांना जेवायला जायचे आहे असे सांगुन नेले गेले होते, असे विधान काही आमदारांनी केले आहे.एकदा सूरत व गोवा हत्तीला पंचतारांकित हॉटेलमध्ये नजरकैदी बनवून ठेवले होते, विश्वासदर्शक ठरावाच्या मतदानाच्या वेळी त्यांना बंदोबस्तात विधानसभेत आणले होते.एकदाचे हात वर करून मतदान केल्यावरच त्यांना मुक्त केले गेले.इडी,आयटी व सीबीआय ची भीती नसती तर किती आमदारांनी उघडपणे बंड केले असते ? याचे आत्मसंशोधन फुटीर गटाने करावे.
हे कमी म्हणून की काय भाजपाच्या दबाव तंत्राची मोहिनी एकनाथ शिंदे यांना पडली.गुण नाही तर वाण लागला. त्याची सुरूवात अंबरनाथचे एकनिष्ठ शिवसेना शहर प्रमुख व माजी महापौर अरविंद वाळेकर यांचा पोलीस बंदोबस्त काढून घेण्याचा नामर्दपणा दाखवला. त्यापाठोपाठ शिंदे यांचे खासदार पुत्र श्रीकांत शिंदे यांच्या उल्हासनगर येथील कार्यालया वर 26 जून रोजी झालेल्या घोषणाबाजी करणा-यां विरोधात जुलै मधे गुन्हा नोंदविण्यात आला.यात आश्चर्य म्हणजे शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र चौधरी हे घोषणाबाजी प्रसंगी तेथे उपस्थित नसताना त्यांचे नाव गोवण्यात आले तर जे तेथे उपस्थित होते ते शिंदे गटात गेल्याने त्यांची नांवं वगळण्यात आली,या वरून शिंदे गटाची हीन वृत्ती दिसून येते.
शिंदे गटाने शिवसेनेशी एकनिष्ठ राहणा-या व शिंदेंच्या गळफास न लागणा-या शिवसैनिकांवर सरकारी यंत्रणेचा गैरवापर करून दडपशाहीचा प्रयत्न केला असल्याची अनेक उदाहरणे समोर येत आहेत. जुने गुन्हे उकरून काढून गुन्हे दाखल केले जात आहेत. उद्धव ठाकरे यांचे समर्थक ज्येष्ठ माजी नगरसेवक दशरथ पालांडे यांच्या मुलावर बेकायदा बांधकाम प्रकरणी महापालिकेने एमआरटीपी अंतर्गत कारवाई सुरू केली, असाच प्रकार शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकारी समिधा मोहिते झुणका भाकर केंद्रावर हॉटेल सुरू ठेवल्या बद्धल अशीच कारवाई सुरू केली. तसेच त्यांच्या श्रद्धेश या मुलाच्या हिरानंदानी इस्टेट येथील विक्की वाईन व मोटो मोटो या हॉटेलवर पालिकेकडून नेमकी याच वेळी कारवाई केली. नवी मुंबईचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे यांनी एकनाथ शिंदे गटात सामील होण्यास नकार देताच त्यांच्या मुलाच्या बेलापुर येथील हॉटेलवर छापे टाकले होते. कल्याणचे माजी नगरसेवक हर्षवर्धन पालांडे यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला.या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी अक्षम्य विलंब लावत असतानाच काही संशयितांची नांवे वगळली़.
अशा प्रकारे सर्व सामान्य शिवसैनिक जे मुळ शिवसेनेशी एकनिष्ठ राहतआहेत त्यांच्यावर शासकीय यंत्रणांचा गैरवापर करून दहशत व दबाव तंत्राचा वापर करण्यात येत आहे. ही दडपशाहीचा आहे. इंदिरा गांधींच्या आणिबाणिलाही लाजवेल अशी दडपशाही फुटीर गटाचे नेते एकनाथ शिंदे यांच्या वतीने राबवली जात आहे. या दडपशाहीचा अंत निश्चितच होणार आहे.ती वेळ लांब नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या प्रतिकुल निकालाच्या भीतीने मंत्रीमंडळ विस्तार केला जात नाही.फक्त जमवलेले आमदार निसटू नयेत म्हणून विस्ताराची तारीख पे तारीख जाहिर केली जात आहे.
एकनाथ शिंदे अनैतिक मार्गाने संपादन केलेल्या सत्तेचा अतिरेक करून निष्ठावंत शिवसैनिकांना झुकवण्याचा निंदनीय प्रयत्न करीत आहे. त्यांनी लक्षात ठेवावे-
माती कहे कुंभारसे
( शिवसैनिक म्हणत आहेत एकनाथ शिंदेशी)
तू क्या रोंदे मोहे
( तू आम्हाला काय पायदळी तुडवत आहेस ? )
एक दिन ऐसा आयेगा मै रोंदुंगी तोहे
(थोडे दिवसच थांब, आम्हीच (नियती) तुला पायदळी तुडवणार आहे.)
अति तिथे मातीच होते,हे लक्षात ठेवा गद्दारांनो ! ऑगस्ट महिना हा क्रांतीचा महिना असतो,तुमच्या गद्दारीचा व दडपशाहीचा अंत पाहण्यासाठी डोळे सताड उघडे ठेवा, हाच एक गर्भित इशारा !
दिलीप मालवणकर
ज्येष्ठ पत्रकार
9822902470
जिल्हा-ठाणे.