June 30, 2025 2:55 am

शिंदेंचे झाले वांदे , जमवले नाराज कांदे

अपनी भाषा में पढ़े! Translate

बंडखोरी नव्हे तर गद्दारी करून स्वतःला ईडीच्या पीडेतून सोडवण्याची केविलवाणी धडपड एकनाथ शिंदे करीत आहेत. मात्र विनाश काले विपरीत बुद्धी ! अशी अवस्था शिंदे व कंपनीची झाली आहे. मतभेद हे जन्मदात्या आई-वडिलांशीपण असतात,पण त्यामुळे मुर्खपण आपल्या आई वडिलांना धोका देत नाही व त्यांचे अस्तित्व संपवण्याचा मुर्खपणा करीत नाही.नेमके हेच कृत्य एकनाथ शिंदे एण्ड कंपनीने केले आहे.त्याही पुढे जाऊन एकनाथ शिंदे तर माझीच खरी शिवसेना व मीच बापाचा बाप आहे,तसेच शिवसेनेची अधिकृत निशाणी धनुष्य बाण वर ते दावा करीत आहेत.मतभेद सर्वत्र असतात पण मनभेद नसावेत. शिंदे यांना शिवसेनेने काय दिले नाही ? पदं,मान सन्मान, प्रतिष्ठा व प्रचंड संपत्ती.इतकी की ईडीची पिडा मागे लागली.नवख्या मुलाला एकदाच नव्हे तर दोनदा खासदारकी बहाल केली.तरी यांच्या राक्षसी महत्वाकांक्षा व बकासूरी हाव,मग ती पैश्याची असेल किंवा मानपानाची असेल काही संपता संपत नाही.या अतिमहत्वाकांक्षेसाठी व प्रचंड संपत्तीच्या संरक्षणासाठी ते शत्रू पक्षाच्या दावणीला बांधुन घेण्यात धन्यता मानत आहेत. कोणत्याही मंत्रीपदाची हाव न ठेवता कींगमेकरची भूमिका बजावता येते, हे ज्यांनी प्रत्यक्ष कृतीने सिद्ध केले त्या धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा पट्टशिष्य म्हणवणारा हा स्वयंघोषित शिष्य शाखा प्रमुख ते 1997 पासून नगरसेवक, सभागृह नेता,2004 पासून चार वेळा आमदार, विरोधी पक्ष नेता व दोनवेळा कॅबिनेट मंत्रीपद भुषवित आहे,हे कमी म्हणून कि काय स्वतः च्या मुलाला दोन वेळा खासदारकी मिळाली,तरी यांची राक्षसी महत्वाकांक्षा व अभिलाषा पूर्ण होत नाही.आणि ते म्हणतात आम्ही दिघे साहेबांच्या व बाळासाहेबांच्या विचाराचे पाईक आहोत.ज्या शिवसेनेने एका रिक्षा चालकाला सर्वोच्च पदावर पोहचवले त्या शिवसेनेच्या गळ्याला नख लावण्याचा, राजकिय जन्मदात्याला आव्हान देण्याचा निंदनीय प्रयत्न शिंदे करीत आहेत.त्यांच्या सोबत गेलेले आमदार मनाने गेले की दबावाने,कि इडीच्या संकटातून सुखरूप बाहेर पडण्यासाठी हा संशोधनाचा विषय आहे. हिंन्दूत्वाचा अभिमान,बाळासाहेब व दिघे साहेबांच्या विचारांचे पाईक हे सर्व थोतांड आहे. शिवसेनेत असे लाखो शिवसैनिक आहेत की ज्यांना आयुष्यात काहीच मिळाले। नाही,उलट पोलीसी लाठीमार,तुरूंगवास,कोर्ट कचेरीचा ससेमिरा मागे लागला,ज्यांची कुटुंबं पार देशोधडीला लागली,ते निष्ठेने दशकानु दशके शिवसेनेशी एकनिष्ठ राहिले, त्यांच्याकडे पाहिले तर एकनाथ शिंदे किती खुजे आहेत,हेच सिद्ध होते.स्वतःला मोठे नेते म्हणवणारे शिंदे, गटनेता नेमण्याचा अधिकार कोणाला आहे,हेच त्यांना ठाऊक नाही.विधानसभेत गट नेता नेमण्याचा अधिकार पक्ष प्रमुखाला असतो,याचा ही त्यांना विसर पडला,याचे आश्चर्य वाटते.हा गटनेता प्रतोद नेमतो व त्याला व्हिप काढण्याचा अधिकार असतो,हे शिंदेंना सांगावे लागते.शिंदेच्या बंडखोरांचा गट म्हणजे खरी शिवसेना व शिवसेनेच्या निवडणूक चिन्हावर स्वतः चा दावा करणे हे देखील चमत्कारिक आहे.निवडणूक चिन्ह मान्यताप्राप्त राजकीय पक्षाला निवडणूक आयोग देत असतो व मतभेद, वाद उत्पन्न झाल्यावर ते चिन्ह एकवेळ गोठवले जाते परंतू ते विरोधकास दिले जात नाही,हे शिंदे यांना तसा दावा करण्याआधी ठाऊक नसावे. कोणत्याही मार्गाने आमदारांचे संख्याबळ जमा करून पक्ष व सत्ता हस्तगत करणे हा पोरखेळ नाही,हे एव्हाना शिंदे आणि कंपनीच्या लक्षात आलेच असेल.उद्धव ठाकरे यांनी दिलदारपणे मुख्यमंत्री पद देऊ केले,कारण सत्ता लोभापायी पक्ष फुटू नये,हीच त्यांची उदात्त भावना होती.शिंदेंनी ती Offer धुडकावून आपल्या परतीचे मार्ग बंद करून टाकले. भाजपा हा पक्ष कोणालाही मोठं होऊ देत नाही,हे अनेक उदाहरणांवरून सिद्ध झालेच आहे. एकनाथ शिंदे आपल्या हक्काचे, जीवाभावाचे घर सोडून भाडे करारावर परक्या घरात जाऊ पहात आहे. शिंदे यांची अवस्था ना घरका ना घाटका अशी होईल,त्यांचे जे काही होईल ते त्यांच्या कर्माचे फळ असेल परंतू त्यांच्या नादी लागून गद्दार झालेले आमदार मात्र अनाथ होऊन मतदार संघात त्यांचे वांदे होतील,याबाबत माझ्या मनात शंका नाही.

दिलीप मालवणकर (ज्येष्ठ पत्रकार)

9822902470

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!