June 30, 2025 6:53 pm

आगामी निवडणुकीत रस्सीखेच व पाडापाडी निश्चितपणे होणार !

अपनी भाषा में पढ़े! Translate

आगामी निवडणुकीत रस्सीखेच
व पाडापाडी निश्चितपणे होणार !

उल्हासनगर महापालिकेच्या आगामी निवडणूकीसाठी आरक्षणाची सोडत निघाली तसे निवडणूकपूर्व वातावरण तापू लागले.आपल्या प्रभागात आरक्षण पडले म्हणून अन्य प्रभागात बेडूक उडी मारण्याच्या तयारीत अनेक प्रस्थापित नगरसेवक आहेत.तर काही ठिकाणी पत्नी,आई वा वहिनी,भगिनी यांच्यासाठी सेटींग लावणे सुरू झाले आहे. मरण पंथाला लागलेले काही नगरसेवक दारू सोडणे,पथ्य पाळणे ही उपाय योजना करून अभी तो मै जवान हूं, असा अभिनय करीत आहेत.कोरोना काळात होम कोरंटाईन व Not रिचेबल असलेले समाज सेवक बिळातून बाहेर पडून समाजसेवेचे डराव ~~डराव करीत आहेत. नाली सफाई करणार महापालिकचे सफाई कामगार आणि हे कमरेवर हात ठेऊन किंवा बोट दाखवून फोटो सेशन करून ते व्हायरल करणार, एखादे काम सुरू असेल तर ते आपल्याच खिश्यातील निधीतून करीत आहे, असे भासवणार, ही यांची समाजसेवा ! आरोग्य शिबिर म्हणजे खाजगी रूग्णालयांना आयते पेशंट पुरवणे,Pan Card आधार कार्ड शिबीर म्हणजे बोगस मतदार नोंदणीची पूर्व तयारी, हळदीकुंकू समारंभ म्हणजे 10-20 रूपयांचे वाण देऊन मतदारांना आकृष्ट करण्यासाठी एका पवित्र व घरगूती परंपरेचा केलेला गैर वापर, तीर्थ स्थळांची पिकनिक म्हणजे पुन्हा मतदारांना प्रलोभन,पावसाळी छत्र्यासारखी निवडणूक काळात उगवणारी जनसंपर्क कार्यालयं,अशा विविध मार्गांनी निवडणूक जिंकण्यासाठी आटापिटा केला जातो.मी चार निवडणूका लढवल्या पण अशी फालतूगिरी कधीच केली नाही.कदाचित त्यामुळे दोन वेळा पराभूत झालो तरी मला त्याचा खेद वा खंत वाटली नाही.पण आपण त्या मार्गांचा अवलंब न केल्याचा अभिमानच वाटला.Banner, Hoarding बाजी कधी केली नाही.

आता एकेका घरातून तीन तीन दावेदार निर्माण झाले आहेत. एकेका प्रभागाचे स्वयंघोषित संस्थानिक निर्माण झाले आहेत. तिकिट नाही दिले तर अपक्ष लढण्याच्या तयारीत अनेकजण आहेत. मला तिकिट मिळणारच ! या भ्रमात नवोदित उमेदवार आहेत पण प्रस्थापितांची 25-25 वर्षात पोटं व मनं भरली नाहीत तर दुस-या पंगतीचे उमेदवार प्रतिक्षेतच तिष्ठत राहून पुढच्यावेळी नक्की ! या हुकमी भूल थापेला भूलून त्या जीर्ण शीर्ण झालेल्या नगरसेवकांची ओझी वाहत राबराब राबणार. या वेळी 4 ऐवजी 3 चा एक प्रभाग झाल्याने मावळत्या एका नगरसेवकाला स्थलांतर करावे लागणार,त्यामुळे दोन्ही प्रभागात तिकिटां साठी रस्सीखेच होणार. मग हा स्थानिक व तो बाहेरचा वा उपरा असा कलगीतुरा रंगणार.

 

पप्पू कलानीने तर आधीच इच्छुकांना Form वाटप करून चॅाकलेट देऊन ठेवली आहेत. राष्ट्रवादीने युती केली तर अन्य पक्षांच्या वाटेला गेलेल्या जागांवरील चॅाकलेवीर बंडखोरी करणार.आता पप्पू कलानीचा पुर्वीचा धाक राहिलेला नाही.जिथे ओमी व मनोजच जुमानत नाही तिथे इतरांची तर काहीच शाश्वती नाही.पप्पूला अटी व शर्तींवर जेल मधून सुटका मिळाली आहे,त्यामुळें तो पुर्वी सारखी दबंगगिरी करू शकणार नाही, न बोलवता त्याची हजेरीच सर्वकाही सांगून‌ जाते.

मनसेमध्ये काही ठराविक विभागातच प्रभाव असलेले कार्यकर्ते विखूरलेल्या अवस्थेत आहेत.त्यांनी भाजपाशी युती करून त्या जागा मिळवल्या तर 4-5 नगर सेवक तरी निवडून येऊ शकतात. तिच परिस्थिती बहुजन समाज पार्टी व बहुजन विकास आघाडी,पीआरपी सारख्या पक्षांची आहे. panel पद्धतीचा फटका या पक्षांतील सक्रिय कार्यकर्त्यांना बसणार आहे.एकाच वेळी तीन प्रभागात सक्षम उमेदवार मिळू न शकल्याने अन्य समविचारी पक्षांशी युती करूनच त्यांना आपले नशिब अजमामावे लागेल. शिवसेना भाजप हे समविचारी पक्ष नसल्याने कॉन्ग्रेस वा राष्ट्रवादीशी जूळवून घ्यावे लागेल.तरच काही ठिकाणी यश मिळू शकेल.

शिवसेनेत सर्व काही आलबेल नाही,
तिकिटासाठी आलेले व सक्रिय असलेले संधी साधू शिवबंधन एका दिवसात कसे तोडून फेकतात ! हे गेल्या निवडणूकीत आपण पाहिलेच आहे. यावेळी इच्छूकांची गर्दी होईल व नाराजांची मनधरणी करण्यात नेत्यांची दमछाक होईल. त्यामुळे नाराज भावी ही डोकेदुखी ठरेल. कॉन्ग्रेस पक्ष अस्तित्वासाठी झगडत आहे, एकेकाळी याच कांग्रेसची उल्हासनगरवर एक हाती सत्ता होती. आत्ता परिस्थिती विपरीत आहे. रिपाई म्हणजे भगवान भालेराव च्या दोन तीन सीटांपुरता मर्यादित पक्ष राहिला आहे. भाजपामधे अर्थशक्तिच्या बळावर निवडून येणारी 15-20 नगरसेवकांची लॉबी आहे. जीवन इदनानीचा साईपक्ष लवंडा ( जिथे सत्ता तिथे लवंडणारा ) एक गट आहे.त्यांच्यात जनाधार असलेला कोणी नाही. त्यातही आता पडझड झाल्याने तो नामधारी राहिला आहे.

राहता राहिला नव्याने मुळ धरू पाहणारा आम आदमी पक्ष. हा पक्ष आगामी निवडणूकीत “नाराजांचा पक्ष” म्हणून उभारी घेऊ शकतो.ज्यांना पक्षांचे तिकिट नाकारले जाईल, त्यांना आम आदमी पक्षाची दारं सताड उघडी राहतील व समान निवडणूक चिन्हाच्या गरजेपोटी आम आदमीला बरेच रेडिमेड उमेदवार मिळतील.आणि कदाचित आम आदमी पार्टी किंगमेकरचा रोल निभवावा लागेल, जो यापुर्वी साई पार्टी व लोक भारतीने निभावला होता.

दिलीप मालवणकर
9822902470

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!