मदनवाडी परिसरातील शेतकऱ्यांसमोर नवे संकट; पाण्याच्या मोटारी चोऱ्या वाढल्या!
(निलेश गायकवाड )
कधी दुष्काळ तर कधी पुरामुळं हैराण झालेल्या शेतकऱ्यांपुढं आता मोटारी चोरीचं संकट उभं राहिलं आहे. गेल्या काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील मदनवाडी परिसरात सातत्यानं अशा घटना घडत आहेत.
तालुक्यातील घरफोडी, बाईक चोरी, गंठण चोरी अशा घटनांमध्ये वाढ झालेली असतानाच चोरट्यांनी आपला मोर्चा आता शेतीमालाकडे वळवल्याचे निदर्शनास येत आहे. गेल्या काही दिवसांपासून शेतातील पाण्याच्या मोटारी चोरी जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून मोठे आर्थिक नुकसान होत आहे.
बंडगर वस्ती, मदनवाडी, देवकाते वस्ती, विरवाडी, निंबोडी आदी भागातील शेतकऱ्यांच्या मोटारी चोरीचे प्रमाण वाढतच चालत आहे. मोटारी चोरीच्या प्रमाणामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. हजारो लाखो रुपयांच्या मोटारी चोरीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान देखील मोठ्या प्रमाणात होत आहे. अंदाजे मदनवाडी परिसरातील वीस ते पंचवीस शेतकऱ्यांच्या मोटारी चोरीला गेलेल्या घटना घडल्या आहेत.
याबाबत भिगवण पोलिस ठाण्यात तक्रारी दाखल करण्यात आल्या असून पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पुढील तपास करत आहेत.
चोरीचा तपास लागत नसल्यामुळे काही शेतकरी आता तक्रारी देण्याचेच टाळत आहेत. पोलिसांनी वीज मोटार चोरणारे व त्या विकत घेणारे अशा दोघांवरही कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.तसेच तपास यंत्रणा वेग वाढवण्यात यावा याची मागणी देखील त्रस्त शेतकरी करत आहेत.
