मार्गदर्शन कुणाला करता ?
ज्यांनी तुम्हाला सत्ता दर्शन दिले त्यांना ?
‘मार्गदर्शन शिबिरं’ हा निवडणुकी पुर्वीचा परवलीचा शब्द झाला आहे.आणि हे मार्गदर्शन कोणाला तर तर ज्यांनी तुम्हाला सत्तेचा राजमार्ग दाखवला त्यांना ? ज्यांनी तुम्हाला रंकाचा राव बनवला त्यांना ? मार्गदर्शन कोणाला तुमच्याच भाग्य विधात्याला ? एखाद्या प्राचार्याला एखाद्या नाठाळ विद्यार्थ्याने मार्गदर्शन करावे,असा हा हास्यास्पद प्रकार आहे. ज्यांनी तुम्हाला रिक्षा ड्रायव्हर,हिस्ट्रिशीटर, भाजी विक्रेते,
चॅाकलेट कामगार, वरून थेट लोकप्रतिनिधी बनवले,त्यांनाच तुम्ही मार्गदर्शन करणार ? ज्यांनी राब-राब राबून मतदारांत जनजागृती केली व त्यांची मतं तुमच्या पारड्यात टाकून सत्तेच्या मखरात बसवले,त्यांना तुम्ही मार्गदर्शन करणार ??
गेल्या ५० वर्षांत ज्या कार्यकर्त्यांनी अनेक निवडणूकांत प्रचार- प्रसार केला,मतदार संघात दारोदारी प्रचार केला, त्यांना तुम्ही मार्गदर्शन करणार ? काल परवा पर्यंत विरोधक म्हणून पक्ष संपवण्याची भाषा करणारी बेडकं पक्ष संघटनेचं महत्व निष्ठावंतांना सांगून मार्गदर्शन करणार ?
तुम्ही मार्गदर्शन करणार– ” ही निवडणूक अटीतटीची आहे,प्रतिष्ठेची आहे,अभी नही तो कभी नही, मुंबई महाराष्ट्रा पासून तोडणार आहेत,
मराठी अस्मिता धोक्यात आहे,
हिंदूत्वाच्या अस्तित्वाचा हा लढा आहे ! म्हणून या निवडणुकीत झोकून घ्या ! शहराचं देशाचं भवितव्य तुमच्या हातात आहे ! किती वर्षे कार्यकर्त्यांना चुतिया बनवणार ? कधीतरी तुम्ही, मला आता उमेदवारी नको, दुसऱ्या फळीच्या कार्यकर्त्याला उमेदवारी द्या, मला नको,असे कधी तरी म्हणणार का ? गेली २५-२५ वर्षे पदं उबवता,सत्ता भोगता पण आपल्या एखाद्या कार्यकर्त्याला, सहकाऱ्याला उमेदवारी देण्याची दानत होत नाही, आणि चालले मार्गदर्शन करायला !. सत्तेचा मोह सुटता सुटत नाही आणि वरतोंड करून कार्यकर्यांचे निष्ठा व त्यागावर बौद्धिक घेता ? खाऊन- खाऊन पोट फुटायला आले, बंगले,फार्महाऊस, बेनामी मालमत्ता किती, बॅन्क बॅलेन्स किती याची मोजदाद नाही, असे उफराटे लोक भूके,कंगाल, बेरोजगारांना मार्गदर्शन करणार ? “बोले तैसा न चाले त्यास काय करावे,” हे संतांनी सांगितले आहे. अशा मार्गदर्शन शिबिराचे मार्गदर्शक जर सत्ता संपत्तीचे लोभी असतील तर ते काय घंटा मार्गदर्शन करणार ? मार्गदर्शन करायचेच असेल तर मोहत्यागाचा आदर्श घालून नंतर करा मार्गदर्शन ! तयासाठी आधी २५-२५ वर्षे सत्ता उपभोगलेल्या लोकांनी उमेदवारी न मागण्याचा आदर्श घालून द्यावा व नंतर आपले ज्ञान पाजळावे. मार्गदर्शन करायचेच असेल तर एकेका घरात दोन- तीन-चाच चार पदं अडवून ठेवलेल्या लोकांनी एक पद ठेऊन बाकीची पदं इतर कार्यकत्यां करीता सोडून नंतर जरूर मार्गदर्शन करावे.
अन्यथा ही मार्गदर्शन शिबिरं म्हणजे, शिकारीच्या प्रतिक्षेत ध्यानमग्नतेचे सोंग घेणाऱ्या बगळ्याच्या ढोंगासारखे ठरेल !
दिलीप मालवणकर
ज्येष्ठ पत्रकार
9822902470