रोग, किडीचा प्रादुर्भाव रोखण्याबरोबर अतिवृष्टीचा सामना करण्यासाठी सतर्क राहण्याच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचना
प्रतिनिधी-अर्जुन आहेर
रोग, किडीचा प्रादुर्भाव रोखण्याबरोबर अतिवृष्टीचा सामना करण्यासाठी यंत्रणेने सतर्क रहावं अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत. मुंबईत आयोजित खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत ते आज बोलत होते. यंदा चांगल्या पावसाची अपेक्षा असून कृषी विभागानंही उत्तम नियोजन केलं आहे. पूर्व तयारीही समाधानकारक झाल्यामुळे यंदाचा खरीप हंगाम यशस्वी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आरोग्यासाठी पोषक गुणधर्म असणारी बियाणं शेतकरी बांधवाना मोफत देणारं आणि शेतकऱ्यांचा आरोग्याचा विचार करणारं महाराष्ट्र देशातील पहिलं राज्य ठरलं आहे. विकेल ते पिकेल अभियान यशस्वी करण्यासाठी शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करा, शेतीला आधुनिकतेची जोड द्या असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं. केंद्र सरकारची पीक विमा योजना समाधानकारक नाही या राज्य सरकारच्या पाठपुराव्याला यश मिळते आहे. केंद्र सरकार त्यावर विचार करते आहे, ही चांगली बाब असल्याचं ते म्हणाले. यंदाच्या खरीप हंगामासाठी १७ लाख ९५ हजार क्विंटल बियाणं आवश्यक आहे. महाबीज, राष्ट्रीय बियाणे महामंडळ आणि खासगी संस्थेकडे मिळून १९ लाख ८८ हजार क्विंटल बियाणं अपेक्षित आहे, अशी माहिती कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी बैठकीत दिली.
या खरीप हंगामासाठी एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत ४५ लाख २० हजार मेट्रीक टन रासायनिक खतं उपलब्ध होणार असून त्यापैकी सुमारे ९ लाख मेट्रीक टन खतांचा पुरवठा झाला आहे. सध्या राज्यात १६ लाख ९८ हजार मेट्रीक टन रासायनिक खतांचा साठा उपलब्ध असल्याचही त्यांनी स्पष्ट केलं. आंतराष्ट्रीय बाजारामध्ये खताच्या किंमतीमध्ये झालेल्या वाढीमुळे युरिया, डी.ए.पी चे दर स्थिर ठेवण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न करण्यात आले होते. त्यामुळं खतांचे दर स्थिर राहीले असल्याचा दावा भुसे यांनी केला.