ग्रामसुरक्षा यंत्रणा कर्जत तालुक्यातील गुन्हेगारी रोखण्यासाठी ‘महत्वाची’
अखंडित सेवेसाठी ग्रामसुरक्षा यंत्रणेचे शुल्क भरण्याचे पोलीस निरीक्षकांचे आवाहन
प्रतिनिधी.संदिप कायगुडे
कर्जत दि.१६
'सततच्या घरफोड्या, दरोडे टाकणारे चोरटे पकडणे असो...तालुक्यातील चांदे बुद्रुक येथे लागलेली मोठी आग असो...कर्जत पेट्रोल पंपावर पडलेला दरोडा असो...भांबोरा येथील आगीपासून वाचलेले शंभर एकर ऊसक्षेत्र असो...गावातील सुखद किंवा दुःखद घटना असो....तालुक्यातील विविध भागांतील अशा शेकडो घटनांवर ग्रामसुरक्षा यंत्रणेमुळे यशस्वी नियंत्रण मिळवता आले आहे. गुन्हेगारी रोखण्याबरोबरच चोरट्यांवर 'वॉच' ठेवणारी ही यंत्रणा वार्षिक शुल्काच्या रकमेअभावी 'अनवॉच' होऊ नये यासाठी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी तालुक्यातील गावांना या यंत्रणेचे वार्षिक शुल्क तात्काळ भरून या यंत्रणेची अखंडितपणे सेवा सुरू ठेवण्याचे आवाहन केले आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव यांच्या पुढाकारातून व पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या विशेष प्रयत्नातून कर्जत तालुक्यात ग्रामसुरक्षा यंत्रणा सुरु झाली. ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या एकाच आपत्कालीन कॉलवर संपुर्ण तालुक्याला व गावाला एकाचवेळी सतर्क करणाऱ्या या यंत्रणेमुळे चोऱ्या,दरोड्यांवर वॉच राहून ही यंत्रणा चोरट्यांना अक्षरशः सळो की पळो करून सोडते. या यंत्रणेत सहभागी असलेल्या नागरीकांना वेळोवेळी सर्व माहिती मिळून घडणाऱ्या विपरीत घटनांपासून संरक्षण मिळवता आले. कोरोना काळात या यंत्रणेचे महत्व अधिक अधोरेखित झाले.ही यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी गावातील प्रत्येक कुटुंबाला वर्षाकाठी यंत्रणेच्या लाभासाठी यंत्रणेचे मालक डी. के. गोरडे यांच्या खात्यावर ५० रुपये शुल्क पाठवायचे आहेत. मात्र तालुक्यातील अनेक गावांकडुन या यंत्रणेच्या शुल्काची रक्कम भरली गेली नाही. त्यामुळे सर्व यंत्रणा बंद पडली होती. केवळ चोरी, दरोड्याच्या कॉलसाठी ती तात्पुरत्या स्वरूपात सुरू करण्यात आली आहे. अन्य कोणताही संदेश या यंत्रणेवरून देणे बंद आहेत. गावांतील प्रत्येक कुटुंबातील सदस्य या यंत्रणेशी जोडले गेले आहेत मात्र ही यंत्रणा शुल्काअभावी बंद होण्याच्या मार्गावर आहे त्यामुळे पुन्हा तालुक्यातील गुन्हेगारी वाढू शकते.गावातील प्रत्येक कुटुंबांनी दरवर्षी फक्त ५० रुपये द्यावेत अन्यथा १५ व्या वित्त आयोगातून, ग्रामपंचातींनी नागरिकांच्या घरपट्टीतुन ही रक्कम वसुल करून देणे अपेक्षित आहे. छोटे गाव असेल तर अगदी ७ हजार रु. ते मोठ्या गावाला वर्षाला २५ ते ३० हजार रुपयांमध्ये ही यंत्रणा वर्षभर वापरता येते. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ग्रामसुरक्षा यंत्रणा खूपच महत्त्वाची ठरली आहे. गुन्हेगारी कमी होऊन शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी यंत्रणा कायमस्वरुपी सुरु राहणे आवश्यक आहे.
..तर पोलीस यंत्रणेकडून अशा व्यक्तींचा सन्मान!
तालुक्यातील गावांमध्ये कार्यरत असलेली ग्रामसुरक्षा यंत्रणा अखंडितपणे सुरू रहावी व गावाला गुन्हेगारी व वैयक्तिक व सार्वजनिक आर्थिक नुकसानीपासून वाचवता यावे यासाठी वैयक्तिक पुढाकारातून कोणत्याही व्यक्तीला आपल्या गावाची पुर्ण रक्कम भरता येऊ शकते अशा दानशूर व्यक्तींचा कर्जतच्या पोलीस यंत्रणेकडून सन्मान करण्यात येणार आहे.
अशीही होऊ शकते यंत्रणेच्या शुल्काच्या रकमेची तजवीज!
सध्या तालुक्यातील अनेक गावांमध्ये यात्रोत्सव सुरू आहेत. त्यानिमित्त लोकवर्गणीच्या माध्यमातून गावात हगामा, विविध मनोरंजनाचे कार्यक्रम ठरवून पार पाडले जातात. परगावी असलेले नागरीकही आवर्जून यात्रेनिमित्त येतात.यातील ठराविक रक्कम आवर्जून ग्रामसुरक्षा यंत्रणेसाठी वापरली तर गावाला सुरक्षितता निर्माण होईल.
गावातील अधिकारी-पदाधिकाऱ्यांचा सक्रिय सहभाग हवा!
गावाची जबाबदारी उत्तमरीत्या पेलणाऱ्या सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, पोलीस पाटील, तलाठी, स्थानिक नेते मंडळी आदींनी ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या अखंडित सेवेसाठी सक्रिय सहभागाची गरज असून ही रक्कम भरण्यासाठी त्यांनी पुढाकार घ्यायला हवा.