शिवसेना गृहमंत्र्यांवर नाराज असल्याच्या वृत्ताचं खंडन, आपला सहकाऱ्यांवर पूर्ण विश्वास असल्याचं मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण
प्रतिनिधी-अर्जुन आहेर
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना गृहमंत्र्यांवर नाराज असल्याच्या वृत्ताचं खंडन केलं आहे. आपला आपल्या सहकाऱ्यांवर पूर्ण विश्वास असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री सचिवालयानं याबाबत काल पत्रक जारी करुन या वृत्ताचं खंडन केलं आहे.
प्रसारमाध्यमांमध्ये याबाबत चर्चा सुरु होती. यासंदर्भातील बातम्या चुकीच्या आणि विपर्यास करणाऱ्या आहेत. गृहमंत्री उत्तम काम करीत असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. दरम्यान, प्रसारमाध्यमांशी बोलतांना गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी, गृह विभागावर नाराज नसल्याचा मुख्यमंत्र्यांनी खुलासा केला असल्याचं सांगितलं. ते म्हणाले…‘‘माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ऑलरेडी खुलासा त्यांच्या मुख्यमंत्री कार्यालयानं केलेला आहे. अशा प्रकारची कुठलीही नाराजी नाही. नाराजी असण्याचा प्रश्न नाही. आम्ही परस्परांना विश्वासमध्ये घेवूनच सगळे निर्णय घेत असतो.’’गृहखात्याच्या कामकाजात जर काही कमतरता असेल तर त्यात सुधारणा केली जाईल असं ते म्हणाले.
दरम्यान, महाराष्ट्र पोलिसांच्या ११२ तसंच महिला आणि बालक सायबर गुन्हे प्रतिबंधक प्रकल्पाचा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शुभारंभ होत आहे. याशिवाय मुंबई मेट्रोच्या मार्गिका क्रमांक ७ आणि २ अ यांचं लोकार्पण, मराठी भाषा भवन तसंच वस्तू आणि सेवा कर भवनाच्या नवीन इमारतीचं भूमिपूजनही आज केलं जाणार आहे.