10 व 14 नंबर चारीच्या जमिनीचा मोबदला लवकर मिळावा, शेतकऱ्यांना शेतीला पाणी मिळण्यासाठी शिरपूर पाटबंधारे उप अभियंता कार्यालयावर आमदार काशिराम पावरा, भूपेशभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी बांधवांचा मोर्चा
शिरपूर : 10 व 14 नंबर चारीच्या जमिनीचा मोबदला शेतकर्यांना लवकरात लवकर मिळावा तसेच शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीच्या शेवटच्या टोकापर्यंत पाणी मिळावे यासाठी सोमवारी दि. 28 मार्च रोजी दुपारी 12 वाजता शिरपूर येथील पाटबंधारे खात्याचे उप विभाग कार्यालयावर आमदार काशिराम पावरा, उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी बांधव यांच्या वतीने मोर्चा काढण्यात आला असून अधिकाऱ्यांना घेराव घालून शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. तसेच येत्या 15 दिवसांत मागण्या पूर्ण न झाल्यास यापुढे उपोषणाला बसण्याचा इशारा पदाधिकारी व शेतकऱ्यांनी यावेळी दिला.
यावेळी तालुक्याचे आमदार काशिराम पावरा, प्रियदर्शिनी सहकारी सूतगिरणीचे चेअरमन भूपेशभाई पटेल, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी, धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक प्रभाकरराव चव्हाण, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष के. डी. पाटील, ऍड. बाबा पाटील, शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती नरेंद्रसिंग सिसोदिया, संचालक अविनाश पाटील, जिल्हा परिषद सदस्य देवेंद्र पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य नरेंद्रसिंग जमादार, एकनाथ जमादार, जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, तालुकाध्यक्ष किशोर माळी, भटू माळी मांडळ, संजय आसापुरे, धनराज मराठे थाळनेर, भरत मराठे थाळनेर, प्रताप मराठे, उज्ज्वल पाटील, जितेंद्र सूर्यवंशी, प्रशांत गिरासे, भास्कर पाटील, सर्जेराव पाटील थाळनेर, योगेश बोरसे उपसरपंच पिळोदा, भुलेश्वर पाटील मांजरोद, वासुदेव पाटले मांजरोद, अशोक रामकृष्ण पाटील भोरटेक, रघुनाथ पंढरीनाथ पाटील भोरटेक, दरबारसिंग बंजारा अजनाड, जनार्दन पाटील भाटपुरा, भटेसिंग राजपूत होळनांथे, अरमान मौले भावेर, दर्यावसिंग जाधव बभळाज, संतोष जाधव, लाला गिरासे, सोनू राजपूत, महेंद्र राजपूत, संतोष माळी, यतिष सोनवणे, तालुक्यातील अनेक शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी आमदार काशिराम पावरा, उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, माजी नगराध्यक्ष प्रभाकरराव चव्हाण, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष के. डी. पाटील यांनी अधिकारी यांच्याबाबत रोष व्यक्त करत शेतकऱ्यांच्या बाजूने अनेक मुद्दे अधिकार्यांसमोर उपस्थित करून लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्याबाबत मनोगत व्यक्त केले. यावेळी अधिकाऱ्यांनी शासनाकडून 10 नंबर चारीच्या जमीन मोबदला बद्दल शेतकऱ्यांना 1.45 कोटी रुपये तर 14 नंबर चारीसाठी 2.59 कोटी रुपये मंजूर झाल्याचे सांगून येत्या काही दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होईल असे सांगितले. परंतु, ही रक्कम फारच तुटपुंजी असल्याचे सांगत पदाधिकारी व शेतकरी यांनी याबाबत वरिष्ठ अधिकारी यांच्याशी देखील संवाद साधून योग्य न्याय मिळावा अशी मागणी केली, अन्यथा 15 दिवसांनंतर उपोषणाला बसणार असल्याचे सांगितले.
पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांच्या आडमुठे धोरणामुळे शेतकऱ्यांना वेठीस धरले जात आहे. अनेर प्रकल्पात / धरणात अब्जावधी लिटर पाणीसाठा उपलब्ध असून देखील शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी सोडले जात नाही.
तसेच इरिगेशन खात्याचे कोणतेही अधिकारी शेतकऱ्यांकडे पाणी मागणीचे अर्ज घेण्यासाठी येत देखील नाही. शेतकरी हिसाळे युनिटवर पाणीपट्टी भरण्यासाठी वणवण फिरतात. 10 नंबर, 11, 13, 14 नंबर चारीच्या शेवटपर्यंत एकही थेंब पाणी आजपर्यंत पोहोचले नाही. सुरुवातीच्या 4 किलोमीटर पर्यंत अनेर मधून नाल्यावाटून परत नदीत पाणी वाया जाते, परंतु शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध होत नाही. डेप्युटी इंजिनिअर एच. जी. पाटील हे धुळ्याला राहतात, पूर्ण तालुक्याचे सेक्शन खाली पडलेले असते. अधिकारी बी. के. राजपूत म्हणतात माझ्याकडे हिसाळे भाग नंबर 1 आहे तर गवळी साहेब म्हणतात माझ्याकडे हिसाळे भाग नंबर 2 आहे. अधिकाऱ्यांमध्ये आपसात समन्वय नसल्याने शेतकर्यांचा खरीप हंगाम व रब्बी हंगाम मध्ये देखील पुरेसे पाणी मिळत नाही, ही शोकांतिका आहे. अधिकारी हे कार्यालयात बसून ज्याने पाणी घेतले नाही त्याला पाणी पट्टी पाठवतात व ज्याने पाणी घेतले त्यांना पाणीपट्टी पाठवत नाही असा अनागोंदी कारभार पाटबंधारे खात्यामार्फत सुरू आहे असे यावेळी सांगण्यात आले.
2 मार्च 2022 रोजी शिरपूर तालुक्यातील ऍड. बाबा पाटील यांच्यासह 10 नंबर चारीचे बाधित शेतकरी यांनी शेतीचा मोबदला मिळण्यासाठी संबंधित अधिकार्यांना प्रत्यक्ष अर्ज देऊन देखील शेतकरी लाभापासून वंचित आहेत. तसेच अनेर डॅम डेप्युटी इंजिनिअर यांना मंगळवारी 22 मार्च रोजी पुन्हा अर्ज दिला असता यापूर्वी दिलेला अर्ज गहाळ झाला असे बेजबाबदार पणे उत्तर दिल्याचे शेतकरी बांधव यांनी सांगितले.
यापूर्वी 10 नंबर चारी मधून शेतीसाठी पाणी सोडण्याच्या मागणीसाठी अंगावर रॉकेल टाकणे, आत्मदहन करणे असे अनेक प्रकार शेतकरी बांधवांकडून घडले असून देखील अधिकारी अजूनही वटणी वर येत नाहीत, हा फार मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. यापुढे कोणतीही जीवितहानी झाल्यास इरिगेशन खात्याचे संबंधित अधिकारी, कार्यकारी अभियंता, उपअभियंता, शाखा अभियंता हे जबाबदार राहतील व त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली.
तरी 10 नंबर चारीच्या जमिनीचा मोबदला शेतकर्यांना लवकरात लवकर मिळावा तसेच शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीच्या शेवटच्या टोकापर्यंत पाणी मिळावे अशा मागणीचे निवेदन देण्यात आले.
पाटबंधारे विभागातून कोणतेही प्रकारच्या हालचाली होत नसल्याने शेतकऱ्यांना पाटचारी असून देखील पाटाचे पाणी मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पन्नापासून वंचित राहावे लागत असून यामुळे राष्ट्रीय उत्पन्नात घट होत आहे. हे नुकसान संबंधित अधिकारी यांच्या पगारातून कपात करण्यात यावी. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. पाटबंधारे विभागाने संबंधित प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देऊन पाणी सोडणे बाबत योग्य ती उचित कार्यवाही करावी व शेतकऱ्यांना भूसंपादन केलेल्या जमिनीचा मोबदला अदा करण्यात यावा अशा मागणी बाबत शेतकरी बांधव लढा देत आहेत.