११ हजार झाडांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; कर्तव्य विसरलेल्या लोकप्रतिनिधींना पत्राद्वारे नागरिक करणार आव्हान..
अमळनेर : विक्की जाधव.
लोकसहभागातून उभारलेल्या आणि सुमारे ११ हजार झाडांचे संवर्धन-संगोपन सुरू असलेल्या साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठानच्या परिसराला संरक्षणात्मक कंपाऊंड उभारण्यात यावे, अशी मागणी पर्यावरणप्रेमी दर्शना पवार यांनी केली आहे. कंपाऊंड नसल्यामुळे समाजकंटकांकडून दोन वेळा परिसरात आग लावण्यात आल्याचा आरोप करत, त्यात अनेक झाडांचे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले. पर्यावरण संवर्धनासाठी उभारलेल्या या हरित उपक्रमाचे संरक्षण करणे ही प्रशासन आणि लोकप्रतिनिधींची सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले.
दर्शना पवार यांनी सांगितले की, तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कार्यकाळात कंपाऊंडच्या कामाला सुरुवात होऊन सुमारे २५ टक्के काम पूर्ण झाले होते. मात्र त्यानंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि आमदार अनिल भाईदास पाटील यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करूनही उर्वरित कामाला गती मिळालेली नाही, असा आरोप त्यांनी केला. पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या या प्रकल्पाकडे दुर्लक्ष का केले जात आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
यासाठी आता जनमत तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, नागरिकांनी आमदारांना फोन व पत्रांच्या माध्यमातून कंपाऊंडच्या कामासाठी पाठिंबा द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.