अंधारात बुडाला तांबेपुरा परिसर; बंद पथदिव्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
अमळनेर : विक्की जाधव
अमळनेर शहरातील प्रभाग क्रमांक १ मधील तांबेपुरा परिसरात गेल्या काही दिवसांपासून पथदिवे बंद असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. गणेश कॉलनी, भवानी नगर, एयूडीपी कॉलनी, समता कॉलनी, विप्रो कॉलनी, वैभव कॉलनी, शिवशक्ती नगर, रामजी वाडा आदी भाग रात्री अंधारात बुडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पावसामुळे रस्त्यालगतचे गवत व काटेरी झुडपे मोठ्या प्रमाणात वाढली असून त्यात सापांसह सरपटणाऱ्या प्राण्यांचा वावर वाढला आहे. रात्री कामावरून घरी परतणाऱ्या नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असून सर्पदंशाच्या घटनाही घडल्याची माहिती स्थानिकांनी दिली.
स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही पथदिवे सुरू करण्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला आहे. एखादी गंभीर दुर्घटना घडण्याची वाट प्रशासन पाहत आहे का, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. नगरपालिका प्रशासनाने तातडीने बंद पथदिवे सुरू करून शहरातील सर्व प्रभागांतील मूलभूत सुविधा सुरळीत ठेवाव्यात, अशी जोरदार मागणी होत आहे. “मोर्चा किंवा आंदोलन झाल्यानंतरच प्रशासन जागे होणार का?” अशी प्रतिक्रिया व्यक्त करत नागरिकांनी त्वरित कारवाईची अपेक्षा व्यक्त केली आहे.