करमाळा प्रतिनिधी – शासनातर्फे राबवण्यात येत असलेले ‘SIR’ (विशेष मतदार यादी पडताळणी अभियान) अत्यंत कौतुकास्पद असून, यामुळे खऱ्या आणि निष्ठावंत मतदारांना ग्रामपंचायतीपासून लोकसभंपर्यंत त्यांचा हक्काचा आणि कामाचा माणूस निवडून देता येईल, असे प्रतिपादन शिवसेनेच्या तालुकाप्रमुख प्रियांका गायकवाड यांनी व्यक्त केले. रविवार, ३ एप्रिल २०२६ रोजी किल्ला वेस येथील खोलेश्वर मंदिरासमोरील सभागृहात बीएलओ (BLO) यांच्या वतीने ‘SIR’ मतदार यादीचे जाहीर वाचन करण्यात आले. या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना प्रियंका गायकवाड यांनी आपली प्रतिक्रिया दिली.
गायकवाड म्हणाल्या की, स्थानिक नागरिकांना परिसरातील अडीअडचणी आणि प्रश्न चांगल्या प्रकारे माहिती असतात. त्यामुळे कोणाला मतदान करायचे हे त्यांनी ठरवलेले असते. परंतु, जे लोक प्रत्यक्षात प्रभागात राहत नाहीत आणि पुणे-मुंबईसारख्या मोठ्या शहरांत स्थायिक झाले आहेत, असे मतदार फक्त निवडणुकीपुरते येतात. प्रवासखर्च आणि आर्थिक देवाणघेवाण करणाऱ्या उमेदवाराला मतदान करून हे बाहेरचे मतदार निघून जातात. यामुळे संपूर्ण निवडणुकीचा निकाल बदलतो आणि स्थानिक नागरिकांना मात्र मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागते.
शासनाच्या या पडताळणी अभियानामुळे दुबार नावे, मयत व्यक्तींची नावे आणि स्थलांतरित नावे मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत. यामुळे जवळपास प्रत्येक प्रभागातून २०० ते २५० अनावश्यक मतदार कमी झाले आहेत. ग्रामपंचायत आणि नगरपालिकेचे निकाल अनेकदा अवघ्या १ ते २ मतांनी बदलतात. आता या पारदर्शक पद्धतीमुळे खऱ्या काम करणाऱ्या समाजसेवकाला आणि स्थानिक मतदारांना न्याय मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या अभियानासाठी रात्रंदिवस मेहनत घेतलेल्या तहसीलदार मॅडम, मुख्याधिकारी, बीएलओ (शिक्षक कर्मचाऱ्यांचे) व अंगणवाडी सेविका यांचे प्रियांका गायकवाड यांनी विशेष आभार मानले. तसेच, यापुढे ऑनलाईन पद्धतीने नवीन मतदार नोंदणी फॉर्म भरल्यास, संबंधित बीएलओ (BLO) यांनी प्रत्यक्ष स्थळपाहणी करून लेखी अहवाल दिल्याशिवाय तहसील कार्यालयाकडून त्या अर्जाला ऑनलाईन मंजुरी दिली जाऊ नये, अशी मागणी त्यांनी केली. याबाबत लवकरच तहसीलदारांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन देण्यात येणार असल्याचेही त्यांनी शेवटी सांगितले.